Wednesday, 15 July 2020

रूद्रप्रयाग संगम (कसबा बीड - महे)

                 
            कोल्हापूरची जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणजे पंचगंगा नदी. पंचगंगा म्हणजे पाच पवित्र उपगंगांचा संगम. तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी आणि सरस्वती ह्या नद्यांना येथे उपगंगा मानले आहे. कसबा बीड - महे दरम्यान तुळशी नदी भोगावती नदीस मिळते. तद्नंतर बहिरेश्वर जवळ कुंभी आणि धामणी नदीचा प्रवाह भोगावती नदीस मिळतो. भोगावती नदी व कासारी नदी यांचा संगम प्रयाग चिखली येथे होतो आणि येथून पुढे पंचगंगा नदी प्रवाहीत होते. तर सरस्वती नदीस पंचगंगेची काल्पनिक नदी मानली जाते.

            करवीर महात्म्यानुसार कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाच उपगंगा पाच ॠषींनी आणल्या असे हे मानले जाते. त्यातील पहिली नदी म्हणजे कश्यप ऋषींनी आणलेली तुळशी होय. करवीर माहात्म्यातील उल्लेखाप्रमाणे तुळशी ही साक्षात  शिवस्वरूपिणी. म्हणून शिवा हे या नदीचे आणखी एक नांव. भोगावती म्हणजे साक्षात पाताळगंगा. शिव आणि गंगा एकत्र येऊन महे आणि कसबा बीड गावांच्या जवळ करवीरात रूद्रप्रयाग संगम निर्माण झाला आहे.

            धामोड येथील तुळशी तलावातून उगम पावणारी तुळशी नदी 29 किमी प्रवास करत कसबा बीड - महे नजीक भोगावती नदीस मिळते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राधानगरी तालुक्यातील धामोड या गावाजवळ तुळशी जलाशय पसरला आहे. रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, वनराई, येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत त्यामुळे तुळशी जलाशयावर पर्यटकांची सतत रेलचेल असते. या नदीच्या काठावर धामोड, गोतेवाडी, घानवडे, आरळे, हिरवडे, शिरोली, सावरवाडी आणि कसबा बीड ही महत्त्वाची गावे वसली आहेत.

            राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळाचे भारतातील सर्वांत मोठे धरण बांधले. या धरणाच्या जलाशयास लक्ष्मी तलाव असे नाव देण्यात आले. येथून उगम पावणारी भोगावती नदी 40 किलोमीटर प्रवास करत कसबा बीड - महे नजीक तुळशी नदीस आपल्यात सामावून घेते. गगनबावड्यासाठी जाणार मार्ग, रस्त्याच्या कडेनेच अथांग पसरलेला लक्ष्मी तलाव, मनमोहक निसर्ग, गर्द झाडी, निबीड अरण्य यांमुळे पर्यटक येथे आकर्षित होतात. नदीखोऱ्यात गवा, बिबळ्या, चितळ, सांबर, इ. वन्य प्राण्यांचे अभयारण्य (राधानगरी भागात) असल्याने पर्यटनदृष्ट्याही हे खोरे महत्त्वाचे आहे. या धरणामुळे वीजनिर्मिती व पाणीपुरवठा हे दोन्ही हेतु साध्य झाले आहेत. भोगावती नदी तीरी फेजिवडे, राधानगरी, राशिवडे, परिते, सडोली खालसा, हळदी, आरे, महे आणि कसबा बीड ही महत्त्वाची गावे वसली आहेत.

            या धरणांमुळे नदीखोऱ्यात शेती व औद्योगिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या नद्यांतील पाणी बंधारे बांधून उपसा जलसिंचन पद्धतीने शेतीस पुरविले जाते. नदी खोऱ्यात ऊस, गहू, भात, भुईमूग, सोयाबीन तसेच तंबाखू, भाजीपाला इ. पिके घेतली जातात. यांशिवाय विड्याच्या पानांचे मळे व ऐन, हिरडा, बांबू यांची बने आहेत.

            उगम स्थानापासून 29 किलोमीटर प्रवास करत तुळशी नदी आणि 40 किलोमीटर प्रवास करत भोगावती नदी कसबा बीड - महे दरम्यान संगम करतात. या पवित्र संगमास रूद्रप्रयाग म्हणुन ओळखले जाते. या संगमानजिकच्या टेकडीवरील भैरव आणि सातेरी-महादेव डोंगरावरील महादेव यांच्या दरम्यान असलेला प्रदेश आणि भोगावती, तुळशी व कुंभी यांच्या प्रवाहाने सधन, समृद्ध झालेली पावन तीर्थभुमी म्हणजे प्राचीन तीरवाडचा प्रदेश. प्राचीन अनेक संस्कृतींप्रमाणे तीरवाडची वसाहत ही नदी काठी स्थिर झाले असावी. पुर्वेेेस पवित्र संगम आणि पश्चिमेस टेकड्यांची रांग अशा या लष्करी ठाण्यास आणि व्यापारास सोयीस्कर असणाऱ्या ठिकाणी नगर वसवणे तत्कालीन सत्ताधिशांनी उचित समजले असावे. तिन्ही बाजूंनी नदीचा वेढा असणारे, नदीच्या तीरी वसलेले नगर म्हणून या नगरास प्राचीन काळी तीरवाड हे नाव पडले असावे. तीरवाड मधील तीर म्हणजे काठ आणि वाड म्हणजे गाव असा याचा अर्थ होतो.

            चालुक्य राजवंशाच्या काळापासून या नगराचा उल्लेख आढळतो. कालांतराने शिलाहार राजवंशाची वैभवशाली राजधानी होण्याचा मान या तीरवाडास प्राप्त झाला. तीरवाड हे नगर उत्तरकालीन शिलाहार सत्ताधिशांची हंगामी राजधानी असल्याचे मानले जाते. आजतागायत कसबा बीड ही भोज राजाची राजधानी अशी अख्यायिका अबालवृध्दांत प्रसिद्ध आहे. येथे आढळणारी अनेक मंदीरे, मुर्ती वीरगळ, प्राचीन वास्तुंचे अवशेष, शिलालेख यांवरून राजधानी तीरवाडची कल्पना येते.

            तीरवाड येथे शिलाहार सैन्याचा तळ (शिबीर) होता असे अनेक ताम्रपट तसेच शिलालेखांमध्ये आढळते. तीरवाड शिबीरातुन शिलाहार राजांनी दाने दिली अशा नोंदी सदर ताम्रपट व शिलालेखांवर दिसतात. यानुसार शिलाहारांची हंगामी राजधानी बरोबरच सुरक्षित लष्करी ठाणे या स्वरूपात तीरवाडचे महत्त्व अधोरेखित होते.

            महामंडलेश्वर द्वितीय भोज यांच्या 25 डिसेंबर 1190 साली दिलेल्या दानपत्रामध्ये दान दिलेल्या शेताच्या सीमा सांगताना तीरवाड ते प्रणालकला (पन्हाळा दुर्गाला) जाणार्या मार्गाचा उल्लेख आला आहे. पन्हाळा ही शिलाहारांची अखेरची राजधानी होती. तीरवाड आणि पन्हाळा यांतील मार्गाचा उल्लेख येतो त्यायोगे यांदरम्यान व्यापारी संबंध असल्याचाही कयास वर्तवला जातो. त्याकाळी व्यापारी मार्ग हा तीरवाड मधून पन्हाळा दुर्गाला जात असल्याचा अंदाज पुर्णपणे नाकारता येत नाही. आजपावेतो आढळणार्या सुवर्ण मुद्रा आणि इतर पुराअवशेष यांवरून या नगरीची वैभव संपन्नता ही लक्षात येते. अशा प्रकारे राजवस्ती, व्यापारपेठ आणि लष्करी ठाणे यांच्या दृष्टीने तीरवाड हे नगर एडेनाड विषयातील (एडेनाड - कोल्हापूरच्या आसपासचा प्रदेश, विषय - जिल्हा) अत्यंत महत्त्वाचे नगर म्हणून प्रसिद्ध होते.

            तुळशी नदी आणि भोगावती नदी यांच्या रूद्रप्रयाग संगमामुळेच प्राचीन काळी या प्रदेशाचे महत्त्व वाढले. नदी काठी नगराची स्थापना होऊन त्यास तीरवाड हे नाव मिळाले. यथावकाश लष्करी ठाणे, व्यापारपेठ तसेच हंगामी राजधानी होण्याचा बहुमान तीरवाडास प्राप्त झाला. तीरवाड नगराची स्थापना आणि त्याच्या भरभराटीचे मुख्य कारण म्हणजे हा रूद्रप्रयाग संगम मानता येईल.

            विसाव्या शतकात दोन नद्यांच्या संगमस्थानी मधोमध एका चबुतरा उभारण्यात आला आहे. या चबुतऱ्यावर असणारे शिवलिंग हे नदीने उतार दिल्यानंतर दृष्टीस पडते. सदर चबुतरा हा गाडवे परिवाराच्या मदतीने उभारला गेला आहे. चबुत-याच्या एका देवळीत नरसिंहाचे केवळ मुख आहे.

            प्राचीन काळच्या तीरवाड नगरीमध्ये सध्याची कसबा बीड, महे, आरे, कोगे, सावरवाडी, बहिरेश्वर आणि गणेशवाडी अशी समाविष्ट होत होती. या पवित्र संगमामुळेच तीरवाड नगर स्थापन झाले. तद्नंतर शिलाहार काळात तीरवाडची भरभराट झाली, सुबत्ता, संपन्नता प्राप्त झाली आणि आज या संगमामुळेच सदर सर्व गावांचा सर्वांगीण विकास झाला आहे. सर्वच गावांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांमधे समाधानकारक प्रगती साधली आहे.  एकुणच हा तुळशी-भोगावती नद्यांचा संगम प्राचीन काळच्या तीरवाड आणि आजच्या या सर्व गावांसाठी सर्वार्थाने भाग्यदायी ठरला आहे.


संदर्भ -
शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख
                       - वा. वि. मिराशी
कसबा बीड एक ऐतिहासिक नगर
                        - आनंद दामले

लेखन सहाय्य - उमाकांत राणिंगा सर

सुरज संजय तिबीले
यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड
मो. नं. 9503973234

प्रतिमा




























-: धन्यवाद :-

24 comments:

  1. सुंदर लेख 👍🙌

    ReplyDelete
  2. Wonderful I proud my village Koge

    ReplyDelete
  3. Wonderful I proud my village Koge

    ReplyDelete
  4. खूप छान लेख आहे सुरज...! असेच लेख लिहीत जा जेणेकरून आपल्या जवळच/ स्थानिक असलेल्या इतिहासकालीन संस्कृतीचा वारसा प्रात्प होईल...!

    ReplyDelete
  5. Nice information....
    great Job Suraj & Team

    ReplyDelete