Thursday, 17 December 2020

शिलाहार राजवंश


          या बलाढ्य दख्खनच्या पठारावर अनेक राजसत्ता उदयास आल्या. अनेक सुप्रसिद्ध राजे, राजवंश येथे घडले. यातीलच एक म्हणजे शिलाहार राजवंश. तब्बल सातव्या शतकापासुन दख्खनच्या राजपटलावर शिलाहार घराण्याचे अस्तित्व आपल्याला आढळते. शिलाहार राजे हेे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य करत असत. सुमारे तिनशेहुन अधिक वर्षे आपल्या मर्यादित राज्यात तग धरून असणारी शिलाहारांशिवाय इतर राजसत्ता आढळत नाही. 

          ● मुळ स्थान

          सातव्या शतकात शिलाहार राजे हे पुर्वकालीन चालुक्य राजांचे मांडलिक म्हणून सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (तगर) या ठिकाणी राज्य करत असत. पुर्वकालीन चालुक्यांच्या पतनानंतर काही धाडसी शिलाहार कुमारांनी पश्चिमेस आणि दक्षिणेस जात राष्ट्रकूटांच्या अधिपत्याखाली आपापली राज्ये स्थापल्याचे दिसते. उपलब्ध पुराव्यांनुसार शिलाहारांच्या एकुण सहा शाखा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यात कार्यरत होत्या. यापैकी फक्त तीन शाखा विशेष प्रसिद्ध आहेत तर तीन शाखा अज्ञात आहेत.

          या सर्व शाखांचे शिलाहार राजे स्वतःला तगरपुरेश्वर, तगरपुरपरमेश्वर (कर्नुल शाखा), तगरपुरनगराधिश्वर (एलमेल शाखा), तगरपुरवराधिश्वर (अक्कलकोट शाखा) अशी बिरूदे वापरत असत. या बिरूदांवरून ते आपले मुळ स्थान तगर चा निर्देश करतात. शिलाहारांच्या सर्वप्रथम प्रसिद्ध झालेल्या ताम्रपटाचे संपादन विल्फर्ड यांनी केले होते. त्यांनी तगर म्हणजे देवगिरी म्हणजेच दौलताबाद असावे असे अनुमान काढले होते. अशाच प्रकारे वेगवेगळ्या संशोधकांनी आपली वेगवेगळी मते मांडली. भगवानलाल इंद्रजी यांनी तगर म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे ठिकाण असावे असा अंदाज वर्तवला तर रा. गो. भांडारकर यांनी तगर हे बीड जिल्ह्यातील दारूर हे ठिकाण असावे असे मत मांडले. वि. का. राजवाडे यांनी तगर हे पुर्वीच्या हैद्राबाद संस्थानातील कणकगिरीच्या उत्तरेस असणारे तवंगीर या ठिकाणी असावे असे अनुमान काढले. डाॅ. फ्लीट यांनी सुरूवातीला करवीर म्हणजेच तगर असावे असे अनुमान काढले होते. तगर आणि करवीर ही दोन्ही एकाच फुलाची नावे आहेत आणि करवीर हे कोल्हापूरचे सध्या प्रचलित असलेले दुसरे नाव आहे यावर डाॅ. फ्लीट यांचे अनुमान आधारलेले होते. पण नंतर डाॅ. फ्लीट यांनी आपले मत बदलुन तगर हे सध्याच्या मराठवाडा विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 'तेर' हेच गाव आहे हे सप्रमाण सिद्ध केले.

          दक्षिण भारताच्या पुर्व किनाऱ्यावरील नागार्जुनकोंड, विणुकोंड, वेंगी यांसारख्या नगरांपासुन पश्चिमेस भडोच (प्राचीन नाव बॅरिगाझा) आणि उत्तरेस उज्जयिनी यांना जोडणाऱ्या मार्गावरील तगर ही प्रतिष्ठान (पैठण) आणि नाशिक याप्रमाणे एक प्रमुख बाजारपेठ होती. टाॅलेमी आणि पेरिप्लस यांनी आपल्या पुस्तकांमध्ये तगर चा उल्लेख केला आहे. पण त्यांनी निर्दिष्ट केलेल्या दिशा व अंतरे चुकली आहेत. टॉलेमीने तगर हे भडोच च्या ईशान्येस आहे असे म्हटले आहे तर पेरिप्लस तगर पैठण पासून दहा दिवसाच्या अंतरावर आहे असा निर्देश करतात. पैठण पासून तगरचे अंतर ९६ मैलाचे आहे. तेरे येथे सध्या अर्धवर्तुळाकृती पृष्ठभागाचे त्रिविक्रम मंदिर विद्यमान आहे. हे मूळचे चौथ्या शतकातले बौद्ध चैत्य असावे असा तर्क केला जातो. तसेच येथे उपलब्ध अनेक मंदिरे, लेख, मातीच्या भांड्यांचे तुकडे, मृण्मयमूर्ती आणि नाणी यावरून तेर हे अत्यंत भरभराटीचे ठीकाण असावे याचा अंदाज येतो.

उत्पत्तीकथा ●

          सर्व शिलाहार राजे आपण विद्याधर नृपती जीमुतकेतु यांचा पुत्र जीमुतवाहन यांस आपला मूळ पुरुष मानतात. मध्ययुगीन भारतीय लेखात अनेक राजवंशांची उत्पत्ती ही प्राचीन काळच्या विख्यात वंशापासुन (उदाहरणार्थ कौरव, पांडव इत्यादी पासून) किंवा एखाद्या व्यक्तीपासून (उदाहरणार्थ राम, लक्ष्मण, कर्ण इत्यादी पासून) झाली आहे असे वर्णन आढळते. त्याचप्रमाणे शिलाहार राजे आपली उत्पत्ती विद्याधर नृपती जीमुतकेतू यांचा पुत्र जीमुतवाहन ज्याने गरुडाच्या तावडीत सापडलेल्या नाग कुमार शंखचुडाला त्याच्या बदली स्वतःचा बळी देऊन मुक्त केले त्याच्या वंशात उत्पन्न झालो असा आपल्या लेखात अभिमानाने उल्लेख करतात.

          गरुडाने वासूकीला आपल्या प्रजेतून एक एक सर्प देण्यास भाग पाडले. एके दिवशी शंखचुड नामक सर्पाची पाळी आली. त्याने एका शिलेवर बसून गरुडाच्या हल्ल्याची वाट पाहायची होती. जीमुतवाहन विद्याधर कुमाराला हे पाहून फार वाईट वाटले. त्याने शंखचूड गोकर्ण येथे हे भगवान शिवाच्या दर्शनाला गेला असता त्याची जागा घेतली. तितक्यात गरुडाने तेथे येऊन जिमुतवाहनास भक्षणार्थ नेले.  त्याला अर्धामुर्धा खाल्ल्यावर गरुडाला आपली चूक कळून आली. तेव्हा जीमुतवाहनाच्या पत्नीच्या प्रार्थनेवरून पार्वतीने त्याला जिवंत केले. गरुडाने तेव्हापासून सर्प न खाण्याचे ठरवले आणि त्यापूर्वी मारलेल्या सर्व सर्पांना जीवित केले.

          ही जीमुतवाहनाची कथा मूळच्या पैशाची भाषेतील 'बृहत्कथेमध्ये' होती. तो ग्रंथ आता उपलब्ध नाही. तथापि त्याची संस्कृत रूपांतरे सोमदेवाचे 'कथासरीत्सागर' आणि मज्जरी यांच्या 'बृहत्कथा' मध्ये ती दोन ठिकाणी आली आहे. हे दोन्ही ग्रंथकार अकराव्या शतकात काश्मिरात होऊन गेले.

          उत्तर कोकण शाखेतील शिलाहार छद्वैदेवाच्या सर्वात प्राचीन ताम्रपटात या वंश नामाचे वेगळी उत्पत्ती दिली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे परशुरामाच्या बाणाने त्रस्त झालेल्या पश्‍चिम समुद्राचे रक्षण 'सिलार' नामक विराने केले म्हणून त्याच्या वंशजांना 'सिलार' नाव पडले. पण ही आख्यायिका इतरत्र आढळत नाही.

प्रमुख शिलाहार शाखा

          सातव्या शतकामध्ये चालुक्य राजवंशाच्या पतनानंतर महत्त्वाकांक्षी शिलाहार राजांनी राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून आपापली राज्य स्थापन केली. अशा प्रकारे काळानुरुप शिलाहारांच्या एकुण सहा शाखा स्थापन झाल्या. या सहा शाखांपैकी दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार या तीन शाखा विशेष प्रसिद्ध आहेत.

          सर्वप्रथम दक्षिण कोकण कोकणामध्ये शिलाहारांची शाखा स्थापन झाल्याचे दिसते. दक्षिण कोकण शाखेचा संस्थापक शिलाहार सन्ना फुल यांना राष्ट्रकूट राजा कृष्ण यांच्या कृपेने राज्य मिळाले असा उल्लेख शिलाहारांच्या ताम्रपटात आला आहे. या शाखेच्या अधिपत्याखाली सध्याचा गोवा (प्राचीन नाव सिंहल देश), सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड (प्राचीन नाव इरिडगे प्रदेश) इतका प्रदेश येत असे. सप्तकोंकण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या प्रदेशाची बलिपत्तन (खारेपाटन) ही राजधानी होती.

          त्यानंतर काही काळात उत्तर कोंकण शिलाहार शाखेचे संस्थापक प्रथम कपर्दी यांना राष्ट्रकूट सम्राट तृतीय गोविंद यांच्या कृपेने उदयास आले असावेत. उत्तर कोंकण शाखेची सत्ता ही सध्याच्या ठाणे, कुलाबा, मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्याचा काही भाग तर गुजरात राज्याच्या दक्षिण भागावर चालत असे. कवडीद्वीप किंवा पुरीकोंकण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या राज्याची राजधानी प्रथम पुरी (दंडाराजपुरी अथवा राजापुरी) आणि नंतर ठाणे (स्थानक) या ठिकाणी स्थित होती.

          कोल्हापूरचे शिलाहार बऱ्याच काळाने उदयास आलेले दिसतात. या शाखेचा मूळ पुरुष प्रथम जतिग हे गोमंथ गिरीदुर्गाचे अधिपती होते. हा गोमंत पर्वत कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात स्थित आहे. कोल्हापूर शाखेच्या शिलाहारांचे पूर्वज हे तगरहून निघाल्यानंतर काही काळ कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यात राज्य करीत होते असे दिसते. कालांतराने या शिलाहार शाखेने कोल्हापूर (प्राचीन नाव एडेनाड किंवा क्षुल्लकपुर) या प्रदेशावर आपले राज्य स्थापले असावे. या शाखेचे कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आणि दक्षिण कोंकणचा काही भाग यावर राज्य चालत असे. कुंतल देश म्हणून प्रसिद्ध या राज्याची वळवाड आणि पन्हाळा ही राजधानी होती.

भाषा आणि समाजव्यवस्था ●

          शिलाहार हे कन्नड भाषिक होते. त्यांचे मूळ स्थान तगर हे प्राचीन काळी कन्नड देशात अंतर्भूत होत असे. शिलाहार राजे कन्नड भाषिक होते हे त्यांच्या स्वतःच्या कन्नड बिरूदांवरून (उदाहरणार्थ मलगलगण्ड, गण्डरगण्ड, दण्डवड़र, नन्नीसमुद्र, मरुवक्कसर्प, इडुवरादित्य, अय्यनसिंग इत्यादी) आणि त्यांच्या प्रमुख लेखांवरून स्पष्ट दिसते. शिलाहारांचे प्रमुख लेख हे कन्नड आणि संस्कृत भाषेतच अधिक आढळतात. कोंकणातील सामान्यांची भाषा ही मराठी तर कोल्हापूर प्रदेशातील सामान्यांची भाषा ही कन्नड होती.

          शिलाहार काळात हिंदू, जैन, लिंगायत आणि बौद्ध धर्मी लोक एकत्र राहत असावेत हे उपलब्ध मंदीरे आणि अवशेषांवरून दिसते. सर्वच धर्मांना राजाश्रय होता. तर सर्व समाज हा आपल्या कार्यानुरूप विभागला गेला होता. समाजातील सर्व घटक हे परस्परांवर अवलंबून होते.

राज्य व्यवस्था 

          प्राचीन काळी राज्य शासनाच्या सोयीकरता प्रदेशाचे अनेक विभाग आणि पोटविभाग केले होते. शिलाहार राजवंशाच्या काळात सदर विभाग आणि पोटविभागांसाठी देश, विषय, खंपण/गंपण, नगर व ग्राम अशा संज्ञा प्रचलित होत्या. शिलाहार काळात कोल्हापूर प्रदेशातील सामान्य लोकांची भाषा कन्नड असल्याने तेथील विभागांची नावे ही कन्नड भाषेत तर कोंकण प्रदेशातील विभागांची नावे ही मराठी भाषेत असलेली आढळतात.

          यांत सर्वांत मोठ्या विभागाला देश ही संज्ञा वापरली जाते (उदाहरणार्थ कुंतल देश, महादेश). देशाचा पोटविभाग तो विषय. विषयांच्या शेवटी नाड किंवा खोल्ल अशी नावे जोडलेली असत (उदाहरणार्थ एडेनाड, आजिरगेखोल्ल). विषयांचे खंपण आणि गंपण या नावाचे पोटविभाग पडतात (उदाहरणार्थ मिरींजेगंपण, कोडवल्लिखंपण). त्याचे पोटविभाग म्हणजे ग्राम. याच्या शेवटी पल्लि, पल्लिका, वाड आणि ग्राम अशा संज्ञा वापरल्या जातात (उदाहरणार्थ मंचकपल्लि, चिख्यलपल्लिका, तीरवाड, बोपग्राम). शिलाहार कालीन नगरे ही स्वयंपूर्ण होती. शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा होती तर सरकारात जमा होणारा शेतासारा, व्यापारावर आकारला जाणारा कर यावर राज्यव्यवस्था चालत असे.

मंदीरे, शिल्पकला आणि नाणी

          शिलाहार राजे हे उदारमतवादी होते. शिलाहार राजवंशाच्या शासन काळात अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदीरांची स्थापना करण्यात आली. यामध्ये अंबरनाथचे शिव मंदीर, कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदीर आणि जैन मंदीर तसेच रूपनारायण मंदीर ही विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय शिलाहार नृपती हे कलेचे भोक्ते होते. शिलाहार काळात शिल्पकलेला विशेष प्रोत्साहन होते. या काळातील अनेक मंदीरे, लेणी, वीरगळ, सतीगळ, शिल्पे आणि लेख यांचे कोरीव काम हे अचंबित करणारे आहे.

          शिलाहार काळात मोठ्या प्रमाणावर सुवर्ण नाणी आणि मुद्रा तयार केल्या गेल्या. शिलाहारांच्या लेखात फणम्, बिसिगे आणि द्रम्म या नाण्यांचा उल्लेख आढळतो. फणम् किंवा पणम् हे अगदी लहान आकाराचे पाच किंवा सहा ग्रेन वजनाचे नाणे आहे. तर बिसिगे हे संस्कृत विशोपक किंवा मराठी विसोवा प्रमाणे फणम् च्या विसांश किंमतीचे नाणे असावे. अशा प्रकारची असंख्य नाणी आजतागायत प्राप्त झाली आहेत, होत आहेत.

          शिलाहार राजांच्या अनेक ताम्रपट आणि शिलालेखांवर गरूडमुद्रा आढळते. यावरून ही गरूडमुद्रा शिलाहारांची राजमुद्रा असल्याचे स्पष्ट होते. अशीच गरूडमुद्रा असणारी अनेक नाणी प्राप्त झाली आहेत. याशिवाय विविध प्राणी, वृक्ष, विविध आयुधे, टिंबे कानडी अक्षरे कोरलेली नाणी आढळतात. तसेच झुबा, अंगठी अशाप्रकारचे सुवर्णालंकार आणि सोन्याचा नाग, तार यासारख्या वस्तू सापडल्या आहेत.


संदर्भ -

२) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख

          - वासुदेव विष्णू मिराशी

३) महाराष्ट्र व गोवे शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सुची

          - शांताराम भालचंद्र देव


🙏 धन्यवाद 🙏

 

सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड 

मो. नं. ९५०३९७३२३४

ई-मेल : tibilesuraj7@gmail.com

Saturday, 26 September 2020

कोल्हापूर जिल्हा दुर्ग भ्रमंती

          महाराष्ट्राला गड-किल्ल्यांच्या स्वरूपात मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास या गडांभोवतीच रेंगाळतो. प्राचीन काळी गडकोटांची उभारणी ही मुख्यतः टेहळणी साठी केली जात असे. व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात किल्ल्यांचा वापर होत असे. कालांतराने या किल्ल्यांचे प्रदेश संरक्षणासाठीचे महत्व ओळखून हे गडकोट सामरीक दृष्ट्या सज्ज केले गेले. याच गड-किल्ल्यांवर अनेक राजसत्तांचा उदय झाला. तसेच अनेक राजसत्ता लयास ही गेल्या. या अजिंक्य आणि बेलाग गडांच्या जोरावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी स्वराज्य उभे केले. तर हे किल्ले सर करता करता सबंध भारतावर राज्य करणारी मुघल सत्ता खिळखिळी झाली.

          कोल्हापूर जिल्ह्याला देखील प्राचीन काळापासून गड-किल्ल्यांची परंपरा लाभलेली आहे. प्राचीन काळी कोल्हापूर प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहार राज्यकर्त्यांनी टेहळणीसाठी आणि आपल्या राज्याच्या रक्षणासाठी काही किल्ल्याची निर्मिती केली. यामध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड, गगनगड, शिवगड, भूदरगड, रांगणा आणि सामानगड या किल्ल्यांचा समावेश होतो. स्वराज्य निर्मिती काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी १११ किल्ल्यांची उभारणी केली असे सभासद बखर सांगते. यापैकी चार किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात महाराजांनी निर्माण केले. हे किल्ले म्हणजे महिपालगड, कलानिधीगड, गंधर्वगड, आणि पारगड. कालांतराने अठराव्या शतकात पेशवे आणि आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर शासकीय सोयीसाठी मुडागड आणि दुशाळगडाची निर्मिती झाली. अशाप्रकारे कोल्हापुर जिल्ह्यामध्ये गिरीदूर्ग आणि वनदूर्ग प्रकारातील एकूण १४ किल्ले अस्तित्वात आहेत.


● पन्हाळा ●

          कोल्हापूर शहरापासून सर्वात जवळ आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारा गड म्हणजे पन्हाळा. या गडाच्या नावावरूनच सध्याचा पन्हाळा तालुका ओळखला जातो. हा किल्ला दख्खनच्या पठारावरील सर्वांत मोठा किल्ला आहे. शिलाहार राजवंशाच्या शासन काळात हा किल्ला उभारला गेला आहे. शिलाहार राजा मारसिंह यांच्या ताम्रपटात राजा गोंक यांचा पन्नाले दुर्गाचा स्वामी असा उल्लेख येतो. शिलाहार नृपती गोंक यांनी पन्हाळ्यावर आपले लष्करी ठाणे निर्माण केले होते. कालांतराने शिलाहार राजा महामंडलेश्वर भोज यांनी पन्हाळा गडास संपूर्ण किल्ल्याचे स्वरूप दिले. त्या काळी येथे नागवंशीय लोक राहत असल्याने या गडास पन्नगनालय म्हणजे नाग लोकांचे घर असे नाव मिळाले. याचाच अपभ्रंश होऊन पन्नालय, पन्नाले, प्रणालक, पन्हाळा अशी नाव प्राप्त झाली असावी. कोल्हापूरच्या शिलाहार शाखेचे शेवटचे राजे महाराजाधिराज द्वितीय भोज यांनी आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळा दुर्गावर आणली. यादव राजा सिंघनदेव यांच्या आक्रमणा वेळी पन्हाळा गडावर अखेरची लढाई झाली. यांत शिलाहारांची हार होवून राजा द्वितीय भोज यांना याच गडावर आजन्म कैदेत ठेवण्यात आले.

          शिलाहारांच्या पाडावानंतर हा गड यादवांच्या ताब्यात गेला. नंतर बहामनी आणि आदिलशाही या मुस्लीम सत्ताधिशांकडे याचे अधिकारी राहीले. गडावरील बहुतांश वास्तुंचे बांधकाम हे आदिलशहीच्या काळात झाल्याचे आढळते. बऱ्याच वास्तु या मुस्लिम वास्तुकलेत निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सन १६५९ मध्ये अफजल वधानंतर अल्पावधीतच शिवछत्रपतींनी हा गड स्वराज्यात आणला. स्वराज्यावर चालून येणारे सिद्धी जौहर नावाचे वादळ थोपवण्यासाठी महाराजांनी याच दुर्गाची निवड केली. त्यानंतर या गडाच्या साक्षीने घडलेल्या घटना इतिहासात कायमच्या अजरामर झाल्या. मुत्सद्देगिरी, गनिमी कावा आणि मावळ्यांच्या बलिदानामुळे महाराज सुखरुप निसटले खरे पण हा गड पुन्हा आदीलशहाच्या ताब्यात गेला. मात्र सन १६७३ मध्ये सरदार कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी भेदनितीचा वापर करत हा गड पुन्हा स्वराज्यात आणला.

          स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घकाळ वास्तव्य या गडावर राहिले आहे. त्यांच्या काळात या गडास उपराजधानीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या गडाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे राजधानी व्यतिरिक्त सर्वाधिक काळ वास्तव्य या गडावर राहिले आहे. याशिवाय शिव-शंभूंच्या अखेरच्या भेटीचा पन्हाळा दुर्ग साक्षीदार आहे. तद्नंतर १७१० मध्ये करवीर संस्थानाच्या निर्माणकर्त्या छत्रपती ताराराणी यांनी हा गड आपली राजधानी म्हणून निवडला होता. छत्रपती ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) आणि छत्रपती संभाजी महाराज (तीसरे) यांच्या काळात पन्हाळा किल्ला मराठे शाहिचेे मध्यवर्ती केंद्र बनला होता. आज गडावर राजवाडा, सज्जाकोठी, राजदिंडी मार्ग, अंबरखाना, दारुगोळा कोठाराचे अवशेष, भग्न कचऱ्यांचे अवशेष, तीन दरवाजा, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, नरवीर शिवा काशीद यांची समाधी, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, संभाजी महाराज मंदीर, रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांची समाधी, अंधारबाव, चोरखिंड, वाघ दरवाजा, पुसाटी बुरुज इत्यादी पहावयास मिळते. शिवछत्रपतींच्या विशेष किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला आज देखील निसर्गाचे आणि मानवी विकृतींचे चटके सोसत मानाने उभा आहे. या किल्ल्याच्या जोडीला पावनगड हा किल्ला आहे.










● पावनगड ●

          कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारी एकमेव जोड किल्ल्यांची जोडी म्हणजे पन्हाळा आणि पावनगड किल्ले. आपल्याला जर पन्हाळगड समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी पावनगड समजून घ्यायला हवा. पन्हाळ गडाच्या संरक्षणासाठी पावन गडाचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. शिलाहार राजा गोंक यांच्या काळापासून या गडाचे अस्तित्व आढळते. गडावर आज देखील शिलाहारकालीन विहीरी आणि वास्तू असल्याचे दिसते. सिद्धी जौहर जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर चालून आला तेव्हा त्याच्या सोबत असणाऱ्या इंग्रज तोफांनी पावनगडाच्या बाजुने हल्ला केला होता. त्यामुळे सन १६७३ मध्ये पन्हाळा गड ताब्यात आल्या नंतर महाराजांनी पावनगडाचे महत्त्व ओळखून यास बुरुज, दरवाजे उभारून किल्ल्याचा साज चढवला. एक निमुळता मार्ग पावनगडास पन्हाळ्यापासुन अलग करतो. या किल्ल्यावर खोदीव आयताकृती विहीर, तूपाची विहिर, वाड्याचे अवशेष, दर्गा, काही तोफा, तटबंदी, झेंडा बुरुज इत्यादी पहावयास मिळते. सन १७०३ मध्ये पन्हाळा आणि पावनगडावर चालुन आलेल्या दस्तुरखुद्द औरंगजेबाला हा किल्ला जिंकण्यास तब्बल दोन वर्षे लागली. शेवटी १७०५ साली हा गड फितुरीने औरंगजेबाने बळकावला आणि त्याचे नामकरण रसुलगड असे केले. पण काही काळातच हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी हस्तगत केला.







● विशाळगड ●

          आंबा घाट, अनुस्कुरा घाट, राजापूर घाट, मलकापूर तसेच तळकोकणातील साखरपा, गणपतीपुळे, रत्नागिरी या ठिकाणांवर देखरेख ठेवणारा हा एक खंदा रखवालदार. कोंकणातील बंदरावरून घाटमार्गे व्यापारी माल देशावर येत असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली आहे. शिलाहार नरेश महामंडलेश्वर भोज यांच्या काळातच या गडाची उभारणी झाल्याचे मानले जाते. शिलाहार काळात या गडावर नाग लोकांची वास्तव्य होते. सुरूवातीला यांस खिलगील या नावाने ओळखले जात असे.  कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन यास खिलगिला, खिशागिला, भोजगड, खेळणा ही नावे प्राप्त झाली असावी. सन १६५९ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून या गडाचे नाव विशाळगड असे ठेवले. विशाळगडाच्या बाबतीत एक उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा सरदारांनी बहमणी सैन्याचे केलेले पारिपत्य. सन १४५३ मध्ये मलिक उत्तुजार नामक बहमणी सरदाराने शिर्क्यांचा प्रचितगड जिंकून घेतला आणि शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. यावर आम्ही धर्मांतर करू पण आमचा शत्रु असणारा शंकरराव मोरे यांस पराभूत करुन त्याचे धर्मांतर करावे आणि खेळणा किल्ला जिंकवा, यासाठी लागेल ती मदत आणि पोहोचण्याचा मार्ग दाखवु असे आमिष शिर्क्यांनी मलिक उत्तुजारला दाखवले. या आमिषाला भुलुन मलिक आपल्या सैन्यासह खेळणा गडास निघाला. दिलेल्या शब्दानुसार शिर्क्यांनी दोन दिवस संपुर्ण सैन्याला सहज सोप्या मार्गावरून नेले. पण नंतर त्यांनी बहमणी सैन्यास अतिशय दाट जंगलात आणले. सपाटीवर लढणाची सवय असणाऱ्या बहमणी सैन्याचे या घनदाट जंगलाने अतोनात हाल केले. अशातच मलिक उत्तुजार हा आजारी पडला आणि त्याला सैन्याला आदेश देणे ही मुश्किल बनले. बहमणी सैन्य प्रवास करत आता अशा ठिकाणी येवून पोहोचले की त्यांना मागे ही जाता येत नव्हते आणि पुढे जायचा त्राण त्यांच्यात उरले नव्हते. अशाच एका रात्री हे सर्व गाफिल सैन्य गाढ झोपेत असताना शिर्क्यांच्या आणि मोरेंच्या संयुक्त सैन्याने या सैन्यावर आकस्मिक हल्ला करून सर्व सैन्य कापुन काढले. या लढाईत मराठ्यांनी युक्तीने आक्रमकांचे पारिपत्य केले.

           सन १४६९ मलिक रेहान या बहमणी सरदाराने ७ वेळा प्रयत्न करून हा किल्ला हस्तगत केला. या मलिक रेहान च्या नावाचा दर्गा आज या गडावर आढळतो. येथे हजारो हिंदू-मुस्लिम भाविक नित्य नियमाने दर्शनासाठी येत असतात. सिद्धी जौहर जेव्हा पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता तेव्हा विशाळगडास जसवंतराव दळवी आणि सुर्यराव सुर्वे यांनी वेढा घातला होता. पन्हाळ्यावरून निसटल्या नंतर महाराजांनी हा वेढा फोडत विशाळगडाचा आश्रय घेतला होता. या किल्ल्यांच्या डागडुजी आणि बांधकामासाठी महाराजांनी ५००० होन खर्च केल्याची दफ्तरी नोंद आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील गडावर काही बांधकामे करून घेतली आहेत. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला असता महाराष्ट्राचा कारभार पाहणारे रामचंद्र पंत अमात्य यांनी विशाळगडालाच आपले मुख्य ठिकाण बनवले होते.

          सन १७०१ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिका राणीसाहेब या विशाळगडावर सती गेल्या. त्यांची समाधी गडावर आढळते. याशिवाय विशाळगडावर सहा कोरीव टाके आणि काही गुहा आढळतात. या गुहांमध्ये विशाळदेवीचे स्थान आहे. किल्ल्यावर भगवंतेश्वर मंदिर, राजवाड्याचे अवशेष, अमृतेश्वर मंदिर, मुंढा दरवाजा, रणमंडळ टेकडी, काही विहीरी आणि आठ फुटी तोफ आढळते. संकट काळात महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून लढणारे बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभु यांच्या समाधी या गडावर आहेत. सन १७०१ मध्ये औरंगजेबाने या गडावर आक्रमण केले. तब्बल ६ महिन्यांनी हा किल्ला जिंकून औरंगजेबाने त्यास सरवरलना हे नाव दिले. तद्नंतर १७०७ ला छत्रपती ताराराणी यांनी हा गड जिंकून घेतला जो १८४४ पर्यंत मराठ्यांच्या अखत्यारीत राहीला.






● गगनगड ●

          शिलाहार महाराजाधिराज भोज यांनी या गडाची निर्मिती केली आहे असे मानले जाते. दक्षिण कोंकण बंदरात उतरलेला माल  कोंकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशात येत असे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी या गडाची बांधणी झाली असावी. नागपंथीय गैबीनाथाचे हे मुळ स्थान. गडाच्या बालेकिल्ल्यावर गैबीनाथाची समाधी आढळते. सन १६५८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. एकोणिसाव्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे हा गड प्रसिद्धीस आला. येथे गगनगिरी महाराजांची समाधी आणि मठ स्थापन करण्यात आला आहे. किल्ल्यावर विठ्ठलाई देवी मंदिर, म्हसोबा मंदिर, प्राचीन विहीर, तटबंदीचे अवशेष, जुन्या घरांचे अवशेष आणि तोफा आढळतात.




● शिवगड ●

           कोल्हापूर शहरापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला दाजीपूर अभयारण्यात आहे. या गडाच्या बांधणी संबंधीचा इतिहास फारसा माहीत नसला तरी हा किल्ला शिलाहार नृपती द्वितीय भोज यांच्या काळात बांधल्याचा अंदाज आहे. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट जंगलात मधोमध एका लहानशा टेकडीवर हा किल्ला स्थित आहे. थोडाफार चढ आणि पठार वडा बालेकिल्ला असणारा हा गड आहे. शिलाहार काळात फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात या गडाचा वापर होत असे. सध्या गडावर तटबंदीचे आणि पडक्या वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडावर एक सतीशिळा आहे. या सतीशिळेला स्थानिक लोक उगवाई देवी म्हणून पुजतात. गडावरून कुरली धरण आणि दाजीपूर अभयारण्य यांचे नेत्रदीपक दृश्य दिसते. तसेच दाजीपूर अभयारण्यातील पायी सफर मन सुखावणारा आहे.




● रांगणा ●

           कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय रांगडा किल्ला म्हणजे किल्ले रांगणा. घनदाट जंगल, ओढे पार करत या किल्ल्यावर जावे लागते. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमेवर रांगणा किल्ला स्थित आहे. शिलाहार राजवंशाच्या शासन काळातच या गडाची निर्मिती झाली आहे. देश, कोंकण आणि गोवा या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा अतिशय महत्वाचा किल्ला मानला जातो. या गडाची विशेष बाब म्हणजे सह्याद्रीतील  प्रत्येक किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला  चढाई करावी लागते. मात्र रांगणा गडावर जाण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते. बाराव्या शतकात भोजनानंतर हा गड यादवांकडे आणि नंतर संगमेश्वरच्या जखुरायाकडे गेला. १४७० मध्ये बहमणी सरदारा महम्मद गावान याने हा किल्ला जिंकून घेतला. तद्नंतर या किल्ल्यांचे अधिकार आदीशहाकडे आले.  सन १६६६ ला महाराज आग्रा येथे कैदेत असताना जिजाऊंनी विशेष मोहीम काढुन किल्ले रांगणा घेण्याची जबाबदारी राहुजी सोमनाथ यांच्यावर सोपवली. १६६६ साली  हा गड स्वराज्यात सामील झाला पण लगेचच १४ एप्रिल १६६७ ला आदीलशाही सरदार बहलोलखान आणि व्यंकोजीराजे यांनी या गडाला वेढा दिला. १२ मे १६६७ रोजी शिवछत्रपतींनी जातीने येवून हा वेडा फोडला आणि यानंतर काही काळ गेल्यावर वास्तव्य केले. या गडासाठी महाराजांनी ६००० होन खर्च केल्याची दफ्तरी नोंद आहे. महाराजांनी या गडास प्रसिद्धगड असे नाव दिले.

          औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण हा गड त्याच्या हाती लागला नाही. धामधुमीच्या काळात छत्रपती ताराराणी यांनी काही काळ गडाचा आश्रय घेतला होता. 'करवीरकरांचे महास्थल' अशा प्रकारे या किल्ल्यांची नोंद करवीर दफ्तरी आढळते. याशिवाय १७८१ च्या कागदपत्रात 'एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल' असा उल्लेख आढळतो. सध्या गडावर गणेश मंदिर, रांगणाई देवी मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर, तलाव, खोदीव विहीर, निंबाळकर वाडा तसेच राजसदर यांचे अवशेष आढळतात. गडाच्या पश्चिम बाजूला कोकण दरवाजा दरवाजा, पुर्वेस नारूर दरवाजा याच्यापुढे हत्तीसोंड माची आणि केरवडे दरवाजा आढळतो. गडाजवळील पाटगाव या गावी मौनी महाराजांचा मठ आहे. या मठास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांनी सनदा दिलेल्या आहेत.





● भुदरगड ●

           पन्हाळ्या प्रमाणे हा तालुका ही येथील भूदरगड या किल्ल्यांच्या नावाने ओळखला जातो. सदर किल्ला शिलाहार राजा भोज यांनीच उभारला आहे असे मानले जाते. सन १६६७ मध्ये हा गड स्वराज्यात सामील झाला पण आदिलशहाने तो परत जिंकून घेतला. नंतर सण १६७२ हा गड पुन्हा स्वराज्यात सामील केला गेला. यानंतर मुघलांनी किल्ल्यावर ताबा मिळवला पण छत्रपती ताराराणी यांनी सन १७२१ गड जिंकून तो पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. हा गड मुख्यतः ओळखला जातो ते १८४४ च्या गडकऱ्यांच्या बंडामुळे. सन १८५७ च्या देशव्यापी उठावा पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडकर्‍यांनी इंग्रजी सत्ते विरुद्ध बंड केले. बाबाजी अहिरेकर यांच्या नेतृत्वाखाली भूदरगड इंग्रजांविरुद्ध लढला पण यात पराभुत झाला. इंग्रजांच्या ताब्यात हा गड आल्यानंतर असे बंड पुन्हा होवू नये यासाठी त्यांनी गडावरील सर्व वास्तु नेस्तनाबूत केल्या. आज गडावर भैरवनाथाचे प्राचीन मंदिर, काही वीरगळ, समाधी, दूध सागर तलाव, भवानी मंदिर, महादेव मंदिर, सैनिकांना बसण्यासाठी कातळात खोदलेली १०×१० ची खोली, गुहेत खोदलेले जाखुबाई मंदिर आढळते.




● सामानगड ●

           रांगणा, भुदरगड, गंधर्वगड, पारगड, कलानिधीगड आणि महिपालगड यांच्या मधोमध असल्यामुळे येथून सर्व गडांना रसद आणि दारूगोळा पुरवणे सोयीस्कर असल्याने या गडास सामानगड नाव पडले असावे असे मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणे हा गड देखील शिलाहार काळातच बांधला गेला आहे असे मानले जाते. या गडावरील कोरीव काम अप्रतिम आहे. संबंध कातळात कोरलेल्या विहीरी, मंदिरे, अंधार कोठडी,  कमानी हे आवर्जून पाहण्यासारखे आहे. टेहळणी करीता गडावर १० बुरुजांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय गडावर शिलाहार कालीन अनेक शिल्प, वीरगळ देखील पहायला मिळतात. सन १६६७ मध्ये हा गड स्वराज्यात आल्यानंतर याची किल्लेदारी आणि सबनीशी अण्णाजी दत्तो यांना मिळाली. त्यांनी गडावर अनेक वास्तूंची निर्मिती केली.

          मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत धाडसी घटना म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सवंगडी बहलोल खानावर चालून गेल्याची. बहलोलखानावर चालून जाण्या आधी प्रतापराव गुजरांची छावणी ही याच गडावर होती. या गडाजवळील नेसरी गावत या विरां प्रित्यर्थ स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. सन १८४४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या इंग्रजां विरुद्धच्या बंडामध्ये सामानगड अग्रणी होता. भूदरगड पडल्यानंतरही मुंजाप्पा कदम यांच्या नेतृत्वात सामानगडाने इंग्रजांविरुद्ध कडवा प्रतिकार करत दोन वेळा इंग्रजांचा हल्ला परतवून लावला. सध्या गडावर सात कमान बाव, साखर विहीर, अंधार कोठडी, भवानी मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर, झेंडा बुरुज, प्रवेश बुरुज, वेताळ बुरुज, सोंड्या चिलखती बुरुज आणि याच बुरुजा समोर मुगल टेकडी आहे. ही टेकडी मुगल सैन्याने कृत्रिम रित्या स्वयं परिश्रमाने उभारली असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. सामानगड संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.









● गंधर्वगड ●

          सभासद बखरीतील संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या 111 किल्यांचे यादीत या किल्ल्याचे नाव आहे. या गडाजवळ विशेष असे ऐतिहासिक घटना घडलेली नाही. सदर गड हा वेंगुर्ले, आंबोली घाटावर नजर ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात उभारला असावा. चंदगड तालुक्यातील गंधर्वगड हे गाव सध्या गडावर नांदते आहे. सध्या गडावर महादरवाज्याचे भग्नावशेष, काही वाड्यांचे अवशेष, प्राचीन विहीर, वीरगळ तसेच चाळकोबा मंदिर आढळते. उत्तर बाजूच्या संरक्षक तटबंदी अजून शाबूत असून यामध्ये चोर दरवाजा आणि शौचकुपाची व्यवस्था आढळते.





● पारगड ●

          गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असणारा हा किल्ला मूळ स्वराज्याच्या पार टोकास असल्याने यास पारगड नाव प्राप्त झाले असावे. गोव्याच्या पोर्तुगीजांवर आणि सावंतवाडीचे खेमसावंत यांवर वचक ठेवण्यासाठी महाराजांनी १६७६ साली या किल्ल्याची उभारणी केली. गडाच्या वास्तुशांतीसाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज येथे उपस्थित होते. यानंतर गडाची किल्लेदारी नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना देण्यात आली. या गडावर महाराजांचे काही काळ वास्तव्य राहिले होते. यावेळी गड रक्षणाचे महत्त्व सांगताना महाराजांनी 'जो पर्यंत आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा' असे उद्गार काढल्याचे सभासद बखर सांगते. रायबा मालुसरे आणि त्यांच्या वंशाजानी हे व्रत प्राणपणाने जपले आहे. मोगलांच्या दोन स्वाऱ्या या गडकर्‍यांनी परतवून लावल्या आहेत. तसेच हा गड नेहमी अजिंक्य राहीला आहे. आज गडावर हनुमान मंदिर, भवानी माता मंदिर, राजसदरेचे अवशेष, काही वीरगळ आढळतात. गडावरून कलानिधीगड, तिल्लारी जलाशयाचे आणि सांजावणाऱ्या सुर्य किरणांचे दृश्य विलोभनीय दिसते.





● कलानिधीगड ●

          छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या या किल्ल्यावरील बुरुजांची कलात्मक रचना पाहिली तर आपल्याला ह्या गडाच्या नावाचा उलगडा होतो. तसेच लांबून पाहिल्यास ह्या गडाचा आकार एखाद्या बसलेल्या नंदी प्रमाणे दिसतो म्हणून याला कलानंदीगड असे देखील नाव मिळाले आहे. पु ल देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर. त्यांचे पूर्वज या गडावर वास्तव्यास होते. गडावर भवानी मंदिर, महादेव मंदिर, भैरव मंदिर, प्रवेशद्वार, खोदीव विहीरी तसेच तटबंदी, वास्तुंचे अवशेष सापडतात. गडावरुन पारगड, तिल्लारी परिसरावर नजर ठेवता येते.




● महिपालगड ●

          शिवरायांनी वसलेला आणखी एक किल्ला म्हणजे महिपालगड. श्री गुरुचरित्रामध्ये चौदाव्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख येतो. नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या परिसरात दुर्मिळ वनौषधी आढळतात. या गडाच्या पायथ्याशी आरोग्य भवानी मंदिर आणि  वैजनाथ मंदिर आहे. ही मंदिरे हेमाडपंती बांधनीची असुन ती प्राचीन आहेत. या गडावर कार्तिक स्वामी गुहा आढळतात. गडाच्या दक्षिणेला पायरी बुरुज व महादेव बुरुज आहेत. तर ईशान्येस जळका बुरुज आहे. याशिवाय गडावर कातळात खोदलेली बारव-बाव आढळते.




● मुडागड ●

           नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी या किल्ल्याची उभारणी केली अशी दफ्तरी नोंद आढळते. या गडा मुळे तुळाजी आंग्रे यांना कोकण पट्टीवरील वसूल गोळा करणे आणि पन्हाळा प्रांतावर हल्ले करणे सोयीस्कर झाले होते. तसेच यामुळे घाटावर तसेच सध्या असणाऱ्या पडसाळी धरणाच्या परिसरावर नजर ठेवता येत होते. नाना पेशव्यांचे सहकारी येसाजी आंग्रे आणि सावंतवाडीकर यांनी हा किल्ला जिंकून घेतला. आज गडाचा ताबा अस्ताव्यस्त वाढलेल्या वेली आणि गगनचुंबी झाडांनी घेतल्यामुळे गडाचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. सध्या गडावर बुरुजाचे अवशेष, वाड्याचे जोते, पाण्याचे टाके दिसून येते.

          शिवारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुडागडच्या परिसरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी तटबंदी करुन खास विदेशातुन आणलेले काही हत्ती येथे ठेवले होते. या हत्तींसाठी उभारण्यात आलेले तलाव, टाके आज देखील येथे आढळतात.




● दुशाळगड ●

         मुडागड पडल्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी साखरपा तर्फे देवळे येथे १७५२-५३ दरम्यान दुशाळगड बांधला असे दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. या गडावर जमाव करून कोंकणपट्टी वरील महसूल गोळा करण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे साखरपा तर्फे देवळे येथील एका छोट्या टेकडीवर असणारा हा किल्ला गर्द झाडींनी पूर्ण झाकोळला गेला आहे. सध्या इथे तटबंदी आणि बुरुज यांचे काही अवशेष आढळतात. सदर किल्ला शिवप्रसाद पाटील आणि प्रणालक इतिहास संशोधन मंडळाने शोधला आहे.




संदर्भ -

1) दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे

                - भगवान चिले

2) कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले

               - प्रवास : Prathmesh Harale YouTube Channel

3) दुर्गवारी

               - D Subhash Production YouTube Channel


               🙏 धन्यवाद 🙏



सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. 9503973234

ई मेल : tibilesuraj7@gmail.com

Wednesday, 19 August 2020

तीरवाड - एक प्राचीन सुवर्ण नगर


          शिव (शिवस्वरूपिनी तुळशी नदी) आणि गंगा (पाताळगंगा भोगावती नदी) यांचा पवित्र संगम तीरी वसलेले, शेतीयोग्य सुपीक जमीन आणि निसर्गदत्त संरक्षण लाभलेला असा या प्रदेश म्हणजे प्राचीन तीरवाड नगर. हजारो वर्षांपूर्वी येेेेथे मानवी वसाहत स्थिरावली असावी. हळूहळू ह्या साधारण वस्तीचे गावामध्ये रूपांतर झाले. कालांतराने येथे सर्व सुसज्ज नगर येथे विराजित झाले आणि तद्नंतर यांस राजधानीचा मान प्राप्त झाला, असे हे तीरवाड.

          तीरवाड मधील तीर म्हणजे काठ आणि वाड म्हणजे गाव. नदीच्या तीरावर वसलेले ते तीरवाड.  प्राचीन काळी राज्य शासनाच्या सोयीकरता प्रदेशाचे अनेक विभाग आणि पोटविभाग केले होते. शिलाहार राजवंशाच्या काळात सदर विभाग आणि पोटविभागांसाठी देश, विषय, खंपण/गंपण, नगर व ग्राम अशा संज्ञा प्रचलित होत्या. शिलाहार काळात कोल्हापूर प्रदेशातील सामान्य लोकांची भाषा कन्नड असल्याने तेथील विभागांची नावे ही कन्नड भाषेतच आढळतात. यांत सर्वांत मोठ्या विभागाला देश ही संज्ञा वापरली जाते. उदाहरणार्थ कुंतल देश, महादेश. देशाचा पोटविभाग तो विषय. विषयांच्या शेवटी नाड किंवा खोल्ल अशी नावे जोडलेली असत. उदाहरणार्थ एडेनाड, आजिरगेखोल्ल. विषयांचे खंपण आणि गंपण या नावाचे पोटविभाग पडतात. उदाहरणार्थ मिरींजेगंपण, कोडवल्लिखंपण. त्याचे पोटविभाग म्हणजे ग्राम. याच्या शेवटी पल्लि, पल्लिका, वाड आणि ग्राम अशा संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ मंचकपल्लि, चिख्यलपल्लिका, तीरवाड, बोपग्राम. अशाच प्रकारचे तीरवाड हे कन्नड भाषी नाव तेव्हा या नगरास प्राप्त झाले असावे.

          कोल्हापूर जिल्ह्याच्या ईशान्य भागांस शिलाहार काळात एडेनाड असे नाव होते. क्षुल्लकपुर (कोल्हापूर) प्रमाणे एडेनाड हा स्वतंत्र विषय (जिल्हा) होता. एडेनाड विषयात सध्याच्या करवीर तालुक्यातील पश्चिम भाग, हातकणंगले तालुक्याचा दक्षिण भाग व कागल तालुक्यातील काही भाग या प्रदेशाचा समावेश होत असे. तीरवाडचा समावेश ह्याच एडेनाड विषयात होत असे. कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये प्राप्त झालेल्या शिलालेखामध्ये शिलाहार राजा वीरभोज (द्वितीय) यांनी कोप्परवाड या गावातील जमीन दान दिल्याची माहिती मिळते. सदर शिलालेख मंगळवार दिनांक 25 डिसेंबर 1190 साली दिला असुन या दान दिलेल्या शेताच्या सीमा सांगताना तीरवाडबीड ते पन्नाले दुर्गाला जाणार्या मार्गाचा उल्लेख आला आहे. यातील कोप्परवाड म्हणजे सध्याचे कोपार्डे गाव तर प्रन्न्नाले दुर्ग म्हणजे पन्हाळा किल्ला. बीड ते पन्हाळा मार्गातच कोपार्डे गाव आहे त्यामुळे प्राचीन तीरवाड म्हणजेच सध्याचे बीड यांस दुजोरा मिळतो.

राजा द्वितीय भोज यांच्या दानपत्रातील तीरवाडबीड चा उल्लेख 


           तसेच बीड या नावासंबंधी सुचना करताना अनेकदा तर्क केला जाते की शिलाहार काळा नंतर येथे बेडा म्हणुन ओळखल्या जाणार्या सुवर्ण मुद्रांवरून यांस बीड हे नाव प्राप्त झाले. पण शिलाहार राजा भोज (द्वितीय) यांच्या शिलालेखामध्ये कसबा बीड चा  तीरवाडबीड असा उल्लेख आला आहे. म्हणजेच सध्याचे प्रचलित बीड हे नाव हजारो वर्षांपासून चालत आले आहे. कदाचित बीड ह्या नावामुळेच येथे आढळणार्या सुवर्ण मुद्रांना बेडा हे नाव मिळाले असावे.

          इ.स. 1024 साली चालुक्य सम्राट जयसिंह यांनी दक्षिण कोंकण पादाक्रांत केले. असे त्यांच्या मिरज ताम्रपटावरून कळते. चालुक्यांपैकी हे एकमेव जयसिंह नामक सम्राट तेव्हा कोल्हापूर प्रदेशावर आले होते. या वेळी मिरज आणि कोल्हापूर वर शिलाहार घराणे चालुक्यांचे मांडलिक म्हणून राज्य करत होते. दक्षिण कोंकण मोहिमेत शिलाहार नरेश गोंक यांनी सम्राट जयसिंह यांना मदत केली होती. म्हणून सम्राट जयसिंह यांनी दक्षिण कोंकण चा प्रदेश शिलाहार नरेश गोंक यांच्या ताब्यात दिला असावा. या मोहिमे दरम्यान जयसिंह यांचा हत्तीवरील सेनापती मरण पावला. या अनामिक सेनापतीच्या स्मरणार्थ कसबा बीड मधील समाधी म्हणुन ओळखल्या जाणार्या ठिकाणी एक शिवालय बांधले गेले. तेच आज कल्लेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. शिलाहारापैंकी राजा गोंक हे प्रथम तीरवाड येथे आले होते हे कळते. पण गोंक यांची त्यावेळची राजधानी ही करहाट (कराड) येथे होती. गोंक पुत्र राजा मारसिंह यांनी आपली राजधानी कोल्हापूर येथे आणली.

        कसबा बीड मध्ये पुर्वापार एक अख्यायिका रूढ झाली आहे की 'बीड ही राजा भोज यांची राजधानी होती'. यानुसार मारसिंह यांनी आपली राजधानी कोल्हापूर येथे आणल्यानंतर त्यांचे पुत्र राजा भोज हे या तीरवाड नगरीस आपल्या वास्तव्याचे ठिकाण बनवणारे पहिले शिलाहार राजे असावेत. मुख्य राजधानी पासुन ठराविक ठिकाणी सैन्य तळ आणि विश्रांतीची जागा यासाठी राजा भोज यांनी तीरवाड ला निवडले असावे. तसेच आपल्या राहणीमानास साजेशी नगर रचना करून या नगराला अनेक वास्तु आणि मंदीरांनी सुशोभित केले. त्यामुळेच तीरवाडास आणि आजच्या कसबा बीड ला भोज राजाची राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे.

         प्रथम भोज हेच तीरवाड नगरात वास्तव्यास असणारे पहिल शिलाहार राजे होते या तर्कास दुजोरा देतो तो राजा गंडरादीत्य यांचा ताळले ताम्रपट. राजा गंडरादीत्य हे राजा भोज यांचे बंधू होते ते त्यांच्या नंतर राजे पदी आले होते. ताळले ताम्रपट हा तीरवाड या शिलाहारांच्या स्थायी शिबीरातुन (सैन्य तळ) दिला गेला असा उल्लेख या ताम्रपटात आढळतो. राजा गंडरादीत्य हे तीरवाड येथे त्यांच्या स्थायी शिबीरात सुखसंवादात राज्य करत असता त्यांनी हे दान दिले असे ताम्रपट सांगतो. सदर दानपत्र मंगळवार दिनांक १ फेब्रुवारी १११० रोजी देण्यात आले होते. म्हणजेच राजा भोज यांच्या नंतर गादीवर आलेल्या राजा गंडरादीत्य यांचे काही काळ येथे वास्तव्य होते.

          कसबा बीड चे नागरिक श्री राजाराम वरूटे यांच्या शेतात (वरूटे मळा) दोन शिलालेखांचे काही तुकडे सापडले आहेत. हे शिलालेख शिलाहार नृपती विजयादित्य यांचे आहेत. राजा विजयादित्य हे राजा गंडरादीत्य यांचे पुत्र आणि उत्तराधिकारी होते. या शिलालेखांपैकी पहिला लेख हा एका मोठ्या शिलालेखाचा तुकडा असुन तो कानडी लिपी आणि कानडी भाषेत आहे. इ.स. ११४९ सालाच्या या शिलालेखाच्या उपलब्ध तुकड्यावर राजाचे नाव, त्यांची बिरूदे, लेखाच्या काळ आणि तो वळवाड येथुन राज्य करत होता असा तपशील आहे. राजा गंडरादीत्य यांच्या नंतर राजा विजयादित्य यांचा तीरवाडसोबत प्रत्यक्ष संबंध आला आहे. त्यामुळे तीरवाड हे राजा भोज यांच्या काळातच सुसज्ज नगर झाले असावे. जे राजा गंडरादीत्य आणि राजा विजयादित्य यांच्या काळात संपन्नतेच्या शिखरावर पोहोचले.

राजा विजयादित्य यांचे शिलालेख


         राजा द्वितीय भोज यांची राजधानी ही पन्हाळा दुर्गावर स्थित होती. तर द्वितीय भोज यांच्या एका ताम्रपटात तीरवाडबीड ते पन्हाळा दुर्गाला जाणार्या मार्गाचा उल्लेख आला आहे. म्हणजे तीरवाड नगर हे राजा द्वितीय भोज यांचा उदय होण्यापुर्वीच नावारुपाला आलेले होते. अशा प्रकारे तीरवाड नगरासोबत शिलाहार राजा गोंक, राजा भोज (प्रथम), राजा गंडरादीत्य, राजा विजयादित्य आणि राजा वीरभोज (द्वितीय) यांचा प्रत्यक्ष संबंध होता हे स्पष्ट होते.

          राजा द्वितीय भोज यांच्या दानपत्रात आलेल्या तीरवाड ते पन्हाळा दुर्गाला जाणार्या मार्गाविषयी सुचना करताना डाॅ. ग्रॅहम म्हणतात की काही राजे हे बीड या राजधानीवर राज्य करत असत. बीड च्या राज्यात सध्याचे कोल्हापूर आणि पन्हाळा यांचा समावेश होत असे. या विधानाला मुंबई गॅझेटियर देखील पुष्टी देते. कोल्हापूर आणि पन्हाळा प्रदेशांचा समावेश असणार्या राज्याची राजधानी कसबा बीड असणे ही बीड वासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

          या तीरवाड नगराची वसाहत कशी होती हे निश्चित सांगता येत नसले तरी त्याबाबत अंदाज बांधता येतो. पुर्वी सामान्य जनांची घरे ही कच्ची, झोपडीवजा असत. तर अमीर, उमराव, मोठे व्यापारी, राजे, मंत्रीगण यांची घरे ही पक्की घडीव दगडी बांधकामात असत. तसेच विहीरी, तलाव हे मानवी वस्तीजवळच खोदवले जात किंबहुना मानव अशा पाणवठ्याच्या ठिकाणीच राहणे अधिक योग्य समजतो. त्याचप्रमाणे मंदिरे ही देखील वस्ती पासुन अधिक दुर असत नाहीत. साधारणतः सखल भागात वसाहतीच्या मध्यभागी मंदिर पहावयास मिळतात. आज ही कच्ची घरे जमिनीत विलीन झाली असली तरी पक्क्या घरांचे दगडी अवशेष आढळुन येतात. तसेच दगडी प्रापंचिक वस्तू, पक्की भाजलेली खापरे, भांड्यांचे तुकडे हे अनेक ठिकाणी सहजी सापडतात. बर्याच ठिकाणी सुवर्ण मुद्रा आढळतात. सदर सर्व गोष्टी या मानवी वसाहतीच्या द्योतक आहेत.

प्रापंचिक वस्तू

खापरे आणि भांड्यांचे तुकडे


        अशा स्वरूपाची बरीच स्थळे कसबा बीड आणि त्याच्या सभोवती पहावयास मिळतात. यापैकी थोटाळा, रानबाव, सोन्याचा माळ, ढोक माळ, पाटील मळा (बेंदाड), गोसावकी, वरूटे मळा, चव्हाण पाणंद, कोगे पाणंद ही ठिकाणे या दृष्टीने महत्त्वाची आहेत. थोटाळा या ठिकाणी जैन मंदिराचे अवशेष आणि एक तलाव देखील आढळतो. या भोवती पुरातन वास्तुंचे अवशेष, वीरगळ सापडतात. त्यायोगे तीरवाड ची जैन वसाहत या स्थळी असावी असा कयास वर्तवता येतो.

थोटाळा येथील जैन मंदिर अवशेष


          राणबाव म्हणून ओळखल्या जाणार्या ठिकाणी राणी स्नानासाठी येत असत अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळे सदर ठिकाणी एखादी महालवजा वास्तु असणे शक्य आहे. ह्या तळ्याला लागुनच एका वास्तुचा जोता आणि त्याचे भग्नावशेष आढळतात. यांवरून या अख्यायिकेला आधार मिळतो. राणबाव आणि गणेश तलाव या दरम्यानचा प्रदेश हा किंचित उतरणीचा आहे. या संपूर्ण प्रदेशात अनेक अवशेष हे विखुरलेले आढळतात. तसेच या प्रदेशात प्रापंचिक वस्तू आणि सुवर्णमुद्रा प्राप्त झाल्या आहेत.

राणबाव परिसरातील अवशेष

          गणेश तलाव ते गणेशवाडी दरम्यानचा प्रदेश म्हणजे सध्याची बीडशेड बाजारपेठ. पुर्वी पासुन हा प्रदेश हा सोन्याचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी याच ठिकाणी मोठी व्यापारपेठ आणि याला लागुनच पुर्वेस व्यापारी वसाहत असावी. याच्या दक्षिणेस जवळपास 16 एकर वर पसरलेला गणेश तलाव, त्या परिसरात मिळणारे अवशेष, प्रापंचिक वस्तू आणि सुवर्णालंकार हे येथील वसाहतीचे निर्देशक आहेत. या गणेश तलावाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तलावा अंतर्गत सात विहीरी आहेत. तर तलावातील जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी सुयोग्य यंत्रणा करण्यात आली आहे. पाणी बाहेर पडणार्या जागेवर काहीशा घडीव दगडांची रचना दिसते त्यास स्थानिक भाषेत 'लिक' म्हटले जाते.

गणेश तलाव परिसरातीलअवशेष


        सोन्याच्या माळावरून खाली समाधी परिसर लागतो. येथे आढळलेल्या मानवी हाडे आणि इतर काही अवशेषांवरून येथे दफनभूमी असावी आणि त्यावरून यांस समाधी असे नाव प्राप्त झाले असावे असे दिसते. या परिसरामध्ये आज श्री कल्लेश्वर मंदीर आणि इतर काही अवशेष आढळुन येतात. अकराव्या शतकात चालुक्य सम्राट जयसिंह यांनी दक्षिण कोंकणवर आक्रमण केले. यावेळी झालेल्या युद्धात सम्राट जयसिंह यांचा हत्तीवरील सेनापती मरण पावला. या अमर सेनापतीच्या स्मरणार्थ सम्राट जयसिंह यांनी हे मंदिर बांधले.

पाटील मळा (बेंदाड) परिसरातील अवशेष


          समाधी नंतरच्या प्रदेशाला ढोक माळ असे म्हणतात. ढोक माळाचा भाग हा इतर भागांपेक्षा किंचित उंचीवर आहे. तर त्याच्या भोवती उतरण होत जाते. या ढोक माळाच्या माथ्यावर एका बाजुस बुरुज सदृश्य बांधकामाचा पाया आढळतो. त्याचे स्थान पाहता हा बुरुज तटबंदीचा भाग असावा असे भासते. सभोवार तटबंदी आणि त्या आत वाडा हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आले आहे. ढोक माळाचा समतल माथा आणि तटबंदीचे अवशेष यांवरून हे राजवाड्याचे ठिकाण असावे असा अंदाज बांधता येईल.

गोसावकी परिसरातील अवशेष


          ढोक माळाच्या दक्षिणेचा भाग म्हणजे व्हावटेक. या ठिकाणी वस्तारा आणि वस्तार्याची पाती आढळली होती यांवरून यांस व्हावटेक का म्हणतात याचा उलगडा होतो. राजा या ठिकाणी आपली दाढी वैगरे करण्यासाठी येत असे त्यामुळे याला व्हावटेक म्हणतात अशी अख्यायिका नेहमी सांगितली जाते. पण सदर ठिकाणी पूर्वी नाभिक समाजाची वसाहत होती म्हणून याला व्हावटेक म्हणत ही शक्यता नाकारता येत नाही.

वरूटे मळा परिसरातील अवशेष


          ढोक माळाच्या उत्तर पुर्व भागाला घोडकल असे म्हटले जाते. ह्या भागात घोड्यांचे सांगाडे, हाडे खुप वेळा मिळालेली आहेत. त्यानुसार येथे प्राचीन काळी घोड्यांची पागा असावी असे म्हणता येईल. घोड्यांची पागा ही सैन्य तळापासुन दुर असत नाही. म्हणून ह्या पागेला लागुनच सैन्याच्या निवासाची जागा असावी हे खास. ढोक माळाच्या उंचवट्यांला वेढा देत, राज प्रासादापासुन ठराविक अंतरावर सखल जागेत सैन्याचे निवास स्थान आणि त्याला लागुन अश्वशाळा हे तर्कसंगत आहे. सध्याच्या चव्हाण पाणंदीचा सुरूवातीचा भाग म्हणजे ही जागा असावी असे वाटते.

चव्हाण पाणंद परिसरातील अवशेष


          अशाच प्रकारे लक्ष्मी तलाव आणि त्याच्या पुर्वेचा परिसर. येथे लक्ष्मी मंदिर, गोसावी मठ तसेच अनेक अवशेष आढळतात. यासोबतच वरूटे मळा, कोगे पाणंद येथे येथे वसाहतीच्या पुसटशा खुणा पहावयास मिळतात. सध्याचा कसबा बीड चा मुख्य चौक असणारी जागा ही पुर्वी खाणीची जागा होती अशी माहिती जाणकारां मार्फत मिळते. विविध वास्तु, शिल्प, वीरगळ इत्यादी साठी लागणारा काळा कभिन्न दगड हा या खाणीतुनच प्राप्त होत असावा.

लक्ष्मी तलाव परिसरातील अवशेष


          गावाला तीन बाजुंनी नदीचा वेढा आहे पण एकंदरीत नदी किनारी प्रदेश पाहता येथे मोठी वसाहत असावी असे वाटत नाही. याशिवाय अनेक ठिकाणी नदीने खडकाळ भागात उतार दिला आहे. या भागावरून पावसाळ्या व्यतिरिक्त इतर काळात वाहतुक चालत असावी असे वाटते. कोगे पाणंद येथुन कोगे साठी आणि शिवयोगी मठ येथुन आरे गावासाठी जाणारे मार्ग असावे असे दिसते. ही शक्यता गृहीत धरली तर कोगे पाणंद - लक्ष्मी तलाव - चव्हाण पाणंद / ढोक माळ - गोसावकी - व्यापारपेठ असा आणि व्यापारपेठ - गणेश तलाव - राणबाव - पाटील मळा (बेंदाड) - शिवयोगी मठ - आरे मार्ग असे मार्ग असण्याची शक्यता आहे. यापैकी आरेसाठीचा मार्ग हा विसाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होता हे तेथे आढळणार्या ब्रिटिश कालीन नाण्यांवरून कळते. म्हणजेच नगराच्या मध्यवर्ती ठिकाणाच्या सभोवार मुख्य मार्ग, ह्या मार्गाच्या आत राजवाडा, व्यापारी वसाहत, लष्करी तळ असावा आणि याच्या बाहेर शेती आणि इतर वसाहत असावी असा अंदाज केला जाऊ शकतो.

प्राचीन तीरवाड नगराचा अंदाजित नकाशा


          शिलाहार राजे हे व्यापाराच्या दृष्टीने सकारात्मक होते. व्यापारास राजाश्रय प्राप्त होता. सध्याचे राधानगरी म्हणजे शिलाहारांची वळवाड (वलयवाड, वल्लवाड) ही राजधानी. या राजधानीहुन पन्हाळा दुर्गाला जाणारा व्यापारी मार्ग हा कोटे (कोते), गंगवाड (घानवडे), तीरवाड येथुन जात असे. तीरवाडचे स्थान पाहता येथेही व्यापारपेठ निर्माण झाली. या स्थानाचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व सध्याच्या बीडशेड बाजारपेठे वरून ध्यानात येते. यथावकाश व्यापाराचा आणि व्यापारपेठेचा विकास झाला आणि यासोबतच अनेक व्यापारी येथे स्थायिक झाले.

          सध्याच्या बीडशेड या ठिकाणी प्राचीन काळी व्यापारपेठ आणि व्यापार्यांची वसाहत होती. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीसाठी जमीन कसत असता लोकांना येथे मोठ्या प्रमाणावर नाणी मिळु लागली. या भागात इतके सोने सापडल्याने सदर भागाला सोन्याचा माळ असे नाव पडले. त्यानंतर या सोन्याच्या माळाची ख्याती सर्वदूर पसरली होती असे जाणकार सांगतात. यासोबतच या ठिकाणाच्या आसपास काही लोकांना अतिशय सुरेख कलाकुसरीचे सुवर्णालंकार आणि उत्तम दर्जाच्या दगडी प्रापंचिक वस्तू सापडल्या आहेत. हे सुवर्णालंकार आणि प्रापंचिक वस्तू पाहता येथील व्यापारी वर्गाच्या श्रीमंतीची कल्पना येते.

          कसबा बीड गावात एक उर्दू शिलालेख सापडला आहे. ह्या शिलालेखावर उर्दू भाषेत आयत आणि अल्लाह असे कोरलेले आहे. हा शिलालेख सध्या जोतिबा मंदिर येथे असून सदर शिलालेख म्हणजे एखाद्या इस्लामी प्रार्थना स्थळाच्या चौकटीचा भाग असावा असे तज्ञांचे मत आहे. यावरून कसबा बीड येथे एखादे इस्लामी प्रार्थना स्थळ असावे असे अनुमान निघते. हे अनुमान गृहीत धरता तीरवाड येथे अरब व्यापार्यांची म्हणजेच परदेशी लोकांची वसाहत अथवा सततचा संपर्क असावा असे म्हणण्याचा मोह आवरत नाही.

जोतिबा मंदिर परिसरातील उर्दू शिलालेख

          आजतागायत कसबा बीड आणि त्याच्या सभोवती सोन्याची नाणी व मुद्रा सापडतात. अगदी रोजच्या उठबस असणार्या ठिकाणी अचानक आणि सतत अशी नाणी प्राप्त झाल्याने कसबा बीड मध्ये सोन्याचा पाऊस पडतो आणि ही नाणी नशीबवान व्यक्तीलाच सापडतात अशी अख्यायिका रूढ झाली आहे. तसेच मोठा व्यापार, राज परिवाराच्या वास्तव्याचे स्थान, राज शिबीर यांमुळे तीरवाड नगराची वैभव संपन्नता इतकी उच्च होती की तीरवाडमध्ये सोन्याचाच पाऊस पडतो अशी प्रसिद्धी प्राप्त झाली असावी. आज पंचक्रोशीतील प्रत्येक अबालवृध्दांच्या तोंडी हमखास ही अख्यायिका ऐकायला मिळते. यासंबंधी तज्ञ म्हणतात की प्राचीन काळी जेव्हा राजाचे नगरात स्वागत होत असे अथवा नगर प्रदक्षिणेसाठी प्रस्थान होत असे तेव्हा राजावर सुवर्ण मुद्रांची उधळण केली जात असे. त्यावेळी या सुवर्ण मुद्रा जमिनीत गाडल्या गेल्या आणि आज या विविध कारणांमुळे त्या मुद्रा वर येत आहेत.

बीड मध्ये सापडलेली नाणी आणि सुवर्णालंकार


          पण या मुद्रां सोबतच सुवर्णालंकार आणि इतर सोन्याच्या वस्तू बर्याच ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत. तसेच या नाण्यांचे प्राप्तीस्थळ पाहता ही ठिकाणे वसाहतीची असावी असे भासते. त्यामुळे वसाहत असणार्या ठिकाणी ही नाणी आणि सुवर्णालंकार जमिनीत गाडले गेले जे आज प्राप्त होत आहेत ही शक्यता ही नाकारता येत नाही. तसेच जुन्या मार्गांवर देखील अशी नाणी बर्याच वेळा मिळालेली आहेत. कसबा बीड व आरे यांना जोडणार्या जुन्या मार्गावर प्राचीन काळापासून मध्ययुगीन तसेच ब्रिटिश कालीन नाणी मिळालेली आहेत. यावरून जुने मार्ग आणि वसाहतींच्या ठिकाणी अशी नाणी सापडतात हे विधान योग्य ठरते.

          कोल्हापूर च्या शिलाहारांच्या लेखात फणम् आणि बिसिगे या नाण्यांचा उल्लेख आढळतो. फणम् किंवा पणम् हे अगदी लहान आकाराचे पाच किंवा सहा ग्रेन वजनाचे नाणे आहे. तर बिसिगे हे संस्कृत विशोपक किंवा मराठी विसोवा प्रमाणे फणम् च्या विसांश किंमतीचे नाणे असावे. अशा प्रकारची असंख्य नाणी आजतागायत कसबा बीड मध्ये प्राप्त झाली आहेत, होत आहेत. कसबा बीड मधील बहुतांश लोकांजवळ आज अशी नाणी उपलब्ध आहेत.

          शिलाहार नृपती द्वितीय भोज यांचे इ.स. ११९१ सालाचे केळेशी दानपत्र प्राप्त झाले आहे. या ताम्रपटाचे तीन पत्रे असुन त्याला गरूडमुद्रा जोडली आहे. यावरून शिलाहार राजांच्या राजमुद्रेवर गरूड चिन्हं होते हे लक्षात येते. अशीच गरूडमुद्रा असणारी अनेक नाणी कसबा बीड मध्ये प्राप्त झाली आहेत. याशिवाय विविध प्राणी, वृक्ष, विविध आयुधे, टिंबे कानडी अक्षरे कोरलेली नाणी बीड मध्ये आढळतात. तसेच झुबा, अंगठी अशाप्रकारचे सुवर्णालंकार आणि सोन्याचा नाग, तार यासारख्या वस्तू सापडल्या आहेत. या व्यतिरिक्त गावात एकत्रित स्वरूपात सोने सापडल्याचे ऐकिवात आहे. पण याबाबत कोणताही अधिकृत पुरावा मिळत नाही.

           शिलाहार राजे हे सहिष्णु होते. सर्व धर्मांचे आश्रयदाते होते. त्यांच्या काळात तीरवाड नगर हे सर्व धर्मीयांचे आगार बनले होते. सर्व विभागांत सर्व धर्मांचे लोक एकत्र राहत असले तरी येथे आढळणारी मंदिरे, मठ यांवरून येथे कोणत्या पंथाची, धर्माची लोकवस्ती प्रमुख होती हे सांगता येते. हे सर्व विभाग एकाच नगरात असले तरी त्या विभागांनी आपले असे स्वतंत्र अस्तित्व जपले होते. आज देखील सण एकच असला तरी ते साजरे करण्याच्या पध्दती मध्ये काहीसा फरक आढळतो. हेच या गावांचे वेगळेपण आहे. या सर्व विभागांवर राज्यशासनाचा प्रमुख म्हणून नगराधिपतीचे नियंत्रण राहत असे. 

          महे येथे भैरवनाथ टेकडीवर भैरवनाथाचे मंदिर आहे. तसेच गावात महादेव, मारूती या देवांची मंदिरे आढळतात. याशिवाय येथे अधिक अवशेष सापडत नाहीत. त्यामुळे येथे पुर्वी पासुनच हिंदू धर्मीय लोक राहत होते हे स्पष्ट होते. तर कोगे या गावी पार्श्वनाथाचे जैन मंदिर आढळते. याशिवाय या गावात चाळकोबा आणि महादेव ही मंदिरे आहेत. सध्या या गावात जैन धर्मीय लोक राहत नसले तरी शिलाहार काळात येथेच मुख्य जैन वस्ती असावी असे येथील अवशेषांवरून दिसते. जैन धर्मीयांसोबतच येथे हिंदू धर्मी लोक ही वास्तव्यास होते.

महे येथील भैरवनाथ टेकडी आणि मंदिर

कोगे येथील जैन मंदिर

कोगे येथील महादेव मंदिर 


          पुर्वी पासुनच हिंदू धर्मात शैव पंथीय म्हणजे भगवान शिवाचे उपासक आणि वैष्णवपंथीय म्हणजे श्री विष्णूचे उपासक असे दोन पंथ पडतात पण तीरवाड नगरात हे दोन्ही पंथ एकत्रित राहत होते हे बहिरेश्वर आणि कसबा बीड येथील मंदिरे व शिल्पांवरून कळते. बहिरेश्वर या गावी पलाशतीर्थ नावाचा तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी शेषशायी विष्णूचे मंदिर असलेले दिसते. करवीर महात्म्य मध्ये या मंदिराचा उल्लेख आलेला आढळतो. या मंदिरातील विष्णूची मुर्ती ही होयसळ कालीन शिल्पकलेतील असुन गजगी रंगाच्या गंडकी शिळेत घडवलेली आहे. या शिल्पावरील प्रत्येक बारकावा कुशल कारागिराने अचूक साकारला आहे. या मंदिराच्या उत्तरेस बुवा-गोसावी समाजाचा मठ आहे तर पुर्वेस बहिरेश्वर गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तर शिलाहार कालीन असुन ते हेमाडपंती बांधनीचे आहे. या मंदिराच्या सभोवार वीरगळांची मांडणी केलेली आहे. येथील वीरगळांत इतर गावातील वीरगळांपेक्षा थोडा फरक जाणवतो. या वीरगळांमध्ये शिवलिंग हे नंदीने आपल्या पाठीवर तोलले असल्याचे दृष्य दिसते. तर इतर गावातील वीरगळांत मुख्यतः शिवलिंग हे खाली दाखवण्यात आले आहे.

बहिरेश्वर येथील महादेव मंदिर

बहिरेश्वर येथील शेषशायी विष्णू जलमंदीर


          गणेश तलाव, गावातील गणेश मंदिर आणि गणेशवाडी हे नाव यांचा परस्पर संबंध असावा असा तर्क वर्तवला जातो. या गावात मारूती मंदिर आणि गणेश मंदिर ही मंदिरे प्रमुख आहेत. याशिवाय या गावात प्राचीन अवशेष आढळत नाहीत. सध्याची वसाहत ही प्राचीन वाटत नाही. पुर्वी गणेश तलाव आणि व्यापारपेठेच्या सभोवार असणारी वसाहत ही कालांतराने येथे स्थायिक झाली असावी.

गणेशवाडी येथील मारूती मंदिर


          सावरवाडी गावात भैरवनाथाचे प्रमुख मंदिर आहे. या मंदिर परिसरात जैन मुनींची शिल्प ठेवली असल्याचे दिसतात. मंदिर फार जुने नाही पण ही शिल्पे प्राचीन आहेत असे वाटते. आज या गावात जैन धर्माचे अनुयायी राहत नाहीत त्यामुळे हे अवशेष प्राचीन वसाहतीचेच असावेत. आज येथे हिंदू धर्मीय लोक असले तरी पुर्वी हे जैन धर्मीय लोकांचे स्थान असावे.

सावरवाडी गावातील प्राचीन अवशेष


          तीरवाड ते क्षुल्लकपुर या मार्गावर आरे हे गाव लागते. विसाव्या शतकापर्यंत कोल्हापूरला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होत असे. या गावात हरेश्वर महादेव मंदिर हे मुख्य देवस्थान आहे. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती बांधनीचे असून याच्या छताचे काम हे पुरातत्व विभागाने नंतर केलेले आहे. मंदिराच्या आवारामध्ये वीरगळ ठेवण्यात आलेल्या आहेत. या वीरगळांमध्ये एक वीरगळ अतिशय महत्वाचा आहे. साधारण ५ फुट उंचीचा हा वीरगळ शिलाहार राजा गंडरादीत्य उर्फ गंडरदेव यांचा सेनापती बोमन्ननायक यांच्या स्मरणार्थ तयार केला आहे. वीर बोमन्ननायक हत्तीवर आरूढ कलचुरी राजा बिज्जल यांच्यावर चालून गेला असे या वीरगळावर दाखवले आहे. असेच अगदी हुबेहुब चित्रण कसबा बीड मधील बीडेश्वर मंदिरात असणार्या स्तंभ वीरगळावर देखील आहे. या अशा गोष्टीतुन या गावांची एकरूपता दिसून येते. तर या गावातील नारायण टेक येथे नारायणाचे मंदिर आढळते. याशिवाय या गावात इतर अवशेष मिळतं नाहीत यावरून येथे फक्त हिंदू धर्मीय लोक राहत असत असा कयास आहे.

आरे येथील हरेश्वर महादेव मंदिर


          कसबा बीड म्हणजे या गावात थोटाळा या ठिकाणी जैन मंदिराचे अवशेष आढळतात याशिवाय वीरगळ आणि तलाव आढळतो. यावरून येथे मोठे जैन मंदिर आणि जैन वसाहत असावी असा अंदाज बांधता येतो. तसेच गावात जैन मुनींची शिल्पे देखील मिळतात. याशिवाय बीड मध्ये कल्लेश्वर मंदिर, बीडेश्वर मंदिर, मारूती मंदिर, गणेश मंदिर, जोतिबा मंदीर, लक्ष्मी मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. तर गावच्या आसपास शारजाई, तुकाई, भैरव, गजलक्ष्मी यांची मंदिरे आढळतात. या सर्व मंदिरांवरून आणि अवशेषांवरून या ठिकाणी हिंदू धर्मी लोक अधिक होते हे स्पष्ट होते. इतर गावांपेक्षा कसबा बीड मधील मंदिरे आणि अवशेष हे अधिक प्रमाणात मिळतात. यानुसार कसबा बीड हेच तीरवाड चे मध्यवर्ती ठिकाण असल्याचे सिद्ध होते.

कसबा बीड मधील प्रमुख मंदिरे


          तीरवाड आणि आसपासच्या सर्व भागांवर लक्ष ठेवण्यासाठी पुर्वेस भैरवनाथ टेकडीवर आणि पश्चिमेस सातेरी-महादेव डोंगरावर टेहळणी साठी ठाणे असावे. तीरवाडहून क्षुल्लकपुर ला जाणार्या मार्गावर भैरवनाथ टेकडीवरून लक्ष ठेवता येते तर सातेरी-महादेव डोंगरावरून कोल्हापुर पर्यंतचा संपूर्ण प्रदेश दृष्टीस पडतो. कालांतराने रूद्रप्रयाग संगम तीरी पाण्याची उपलब्धता आणि डोंगराचा आडोसा यामुळे महे या गावी वसाहत वाढली असावी. पण सातेरी-महादेव डोंगरावर पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तेथे वसाहत नसलेली आपल्याला दिसते. आज बीड ते सातेरी या दरम्यान केकतवाडी, धोंडेवाडी आणि गणेशवाडी ही गावे आढळतात त्यांची वसाहत फार जुनी नाही. पुर्वी गावात एखादा साथीचा आजार पसरला तर किंवा दुष्काळ, अतिवृष्टी अशा आसमानी संकटामुळे मुळ स्थानापासून स्थलांतर करत असत. अशा प्रकारे तीरवाडच्या मुख्य वसाहतींचे स्थलांतर होऊन ही गावे निर्माण झाली असावी.

          तीरवाड नगर हे प्रामुख्याने नदी किनारी स्थायिक झाले होते. यासोबतच नगरात अनेक तलाव, विहीरी खोदण्यात आल्या होत्या. नगराला शेतीसाठी सुपीक जमीन आणि मुबलक पाण्याची सोय होती. तसेच या प्रदेशाला निसर्गाने संरक्षण बहाल केले होते. अशा या ठिकाणी प्रथम गावाची स्थापना झाली. कालांतराने या गावाचे नगरात आणि नगराचे राजधानीमध्ये रूपांतर झाले. एक गाव ते सुसज्ज राजधानी होण्यापर्यंतचा प्रवास या भुमीने अनुभवला आहे.

          अतिशय उत्तम बांधनीची मंदिरे, सुरेख कोरीव काम असलेली पाषाणशिल्पे, शेकडो वीरगळ, येथे आढळणार्या सुवर्ण मुद्रा हे सर्व आपल्याला त्या प्राचीन तीरवाडची सफर घडवतात. सोन्याचे गाव अशी ओळख गावाला प्राप्त झाली यावरून या नगराची श्रीमंती आणि संपन्नता लक्षात येते. सोन्याची उधळण करणारी, शिलालेख कोरून घेण्या इतपत मातब्बर मंडळी गावात होती. व्यापारला, सर्व जाती धर्मांना राजाश्रय होता. राज कुटूंबाचे वास्तव्य येथे होते. राज शिबीर होते. या सर्व गोष्टींवरून तीरवाड चे महत्व किती मोठे होते हे स्पष्ट होते.

          या तीरवाड नगराचेच भाग म्हणजे आजची कसबा बीड, आरे, महे, कोगे, बहिरेश्वर, गणेशवाडी आणि सावरवाडी ही गावे. आपण असं म्हणू शकतो की तीरवाड ची ही सात अपत्ये व या गावांच आपापसातील नाते हे भावां समान. आज सर्व गावे स्वतंत्र व सार्वभौम आहेत. प्रत्येक गावाला स्वतंत्र प्रशासन आहे. सर्वच गावांनी विविध क्षेत्रात समतोल विकास साधला आहे. भोगावती नदी आणि तुळशी नदी यांच्या कृपेने ही गावे सर्वसंपन्न झालेली आहेत. पण या सर्वांचे मुळ आहे ते हे प्राचीन तीरवाड नगर. आज जी फळ मिळतं आहेत त्याची बीजे कुठेतरी त्या तीरवाड मध्ये पेरली गेली आहेत. ह्या तीरवाडचे अस्तित्व आज समाप्त झाले आहे. पण त्याचे अवशेष, त्याच्या विषयीच्या अख्यायिका आणि तो दैदिप्यमान इतिहास आजही जिवंत आहे. या सर्वांचे रक्षण व्हावे यासाठी आम्ही आज यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी या ग्रुप द्वारे सुरूवात केली आहे. पण हे काम कोणा एका व्यक्तीचे अथवा संस्थेचे किंवा फक्त प्रशासनाचे आहे असे नाही. हे काम या गावांत राहणार्या प्रत्येकाचे आहे. आपण आपल्या पुर्वजांचे वैभव जसे प्राणपणाने जपतो त्याच प्रमाणे हे आपल्या प्राचीन नगराचे अवशेष आपण जपले पाहिजेत. खर तर ते आपले आद्य कर्तव्य असले पाहीजे. आपापसातील मतभेद विसरून, एकमताने, सर्वांच्या साथीने हा हजारो वर्षांचा इतिहासाचा ठेवा आपण जपायलाच हवा. या इतिहासाच्या संवर्धनाची, जतनाची चेतना गावांतील प्रत्येक नागरिकांत जागली पाहीजे. तरच हे तीरवाड चे वैभव जिवंत राहु शकेल.

          धन्यवाद..!


संदर्भ -

१) कसबा बीड एक ऐतिहासिक नगर

          - डाॅ. आनंद दामले

२) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख

          - वासुदेव विष्णू मिराशी

३) महाराष्ट्र व गोवे शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सुची

          - शांताराम भालचंद्र देव


टीप - सदर लेख हा उपलब्ध साधने आणि अवशेष यांना नजरेसमोर ठेवून शक्यता आणि अंदाजांवर लिहिलेला आहे. यांतील माहीती पुर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही. तरी या संदर्भात आपले मार्गदर्शन आणि सूचनांचे स्वागत आहे.


सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड 

मो. नं. ९५०३९७३२३४

ई-मेल : tibilesuraj7@gmail.com