कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाच्या वरदहस्ताने तुळशी भोगावती तीरी कसबा बीड हे समृद्ध नगर साकारले. शिलाहाराचा लष्करी तळ आणि व्यापारपेठे म्हणून ते नावारुपाला आले. शिलाहार राजांनी या पावन भुमीवर आपले वास्तव्य केले आणि याच काळात त्यांनी गावात अनेक मंदिरांची उभारणी केली. शिलाहार राजे हे शक्तीचे उपासक. श्री महालक्ष्मी हे त्यांचे आराध्य दैवत. तसेच हिंदु, जैन संस्कृती मधील अनेक देवी देवतांचे ते पुजक होते. याचे प्रतीक म्हणजे आज गावात आढळणाऱ्या अनेक देवींची शक्तीस्थाने. आज आपण माहिती घेणार आहोत या कसबा बीड मधील देवींच्या विषयी.
● श्री देवी रेडेलक्ष्मी ●
देवी रेडेलक्ष्मीस गावची आद्य देवता मानले जाते. काही वर्षांपूर्वी बीडच्या मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या एका शेतात देवीचे एक मोठे देवालय अस्तित्वात होते. पण काळाच्या ओघात हे मंदिर नष्ट झाले आणि आज एका लहानशा मंदिरात रेडेलक्ष्मी विराजमान आहे. या लहान मंदिराजवळ प्राचीन मंदिराचे अनेक अवशेष आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरात दोन खंडीत शिल्पे आणि एक खंडीत वीरगळ ठेवण्यात आले आहेत. या शिल्पांपैकी एका शिल्पावर श्रीदेवी रेड्यावर आरूढ असल्याचे शिल्पांकन दिसते. यामुळेच या देवी रेडेलक्ष्मी हे नाव प्राप्त झाले असावे. पूर्वी कसबा बीड गावातील कोणत्याही सार्वजनिक समारंभापूर्वी गावदेवींना बळी देण्याची प्रथा रूढ होती. त्याचप्रमाणे रेडेलक्ष्मीस गाव पाटलानमार्फत रेड्याचा बळी दिला जात असे. गावाचे कल्याण व्हावे, धनधान्य विपुल पिकावे, गाव विविध रोगांपासुन रक्षण व्हावे यासाठी रेडेलक्ष्मीस हा बळी अर्पण केला जात असे. याशिवाय लक्ष्मीला कौल लावुन नैवेद्य अर्पण केले जातात. आज गावातील कांबळे परिवार या देवीची व्यवस्था पाहत आहे.
कसबा बीड ग्रामदेवता रेडेलक्ष्मी
● श्री देवी मरगाई ●
गावची आणखी एक लोकदेवता आहे श्री देवी मरगाई. मरगाई देवीस पार्वतीचा अवतार मानले जाते. महाराष्ट्राच्या अनेक गावखेड्यांच्या वेशीवर मरगाईची मंदिरे असलेली आढळतात. कसबा बीड गावात देखील वेशीवरच देवी मरगाईचे मंदिर आहे. देवी मरगाईस रोग नाशक, जंतू विनाशक देवी मानले जाते. मरगाईच्या कृपेने बाहेरून येणारे विविध सांसर्गिक रोग गावच्या वेशीवरच नष्ट व्हावेत आणि त्यांची बाधा गावातील लोकांना होऊ नये यासाठी या देवीचे स्थान हे गावाच्या वेशीवर असते. कसबा बीड गावात पावसाळ्याच्या सुरुवातीस मरगाई देवीस बळी अर्पण केले जातात. देवीचा दही भाताचा नैवेद्य गावच्या वेशीवर टाकला जातो आणि रक्त पिपासिनी मरगाई देवी रक्ततीलक लावून आमच्या गावाचे रोगांपासून रक्षण कर असे गाऱ्हाणे देवीसमोर मांडले जाते. कसबा बीड गावात ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे.
कसबा बीड ग्रामदेवता मरगाई
● श्री देवी तामजाई ●
गणेश तलाव परिसरामध्ये देवी तामजाईचे स्थान आहे. तांबजाईचे मंदिर लहान असून या मंदिरामध्ये एका पाषाणाला तामजाईच्या रूपात पूजले जाते. जनावरांना एखादा आजार झाल्यास किंवा जनावरांना तांबवा सारख्या परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास या देवीस कापूर लावून तिचा अंगारा जनावरास लावल्यास अशा कीटकांपासून सुटका मिळते अशी अख्यायिका गावात रुढ आहे. ह्या तामजाई मंदिराच्या परिसरामध्ये काही वीरगळ ठेवण्यात आल्या आहेत.
कसबा बीड ग्रामदेवता तामजाई
● श्री देवी अंबाबाई ●

शिलाहार राजधानी कसबा बीडच्या मुख्य चौकाच्या उत्तरेला थोड्या अंतरावर एक तलाव आढळतो. या तलावाकाठी देवी अंबाबाईचे एक जुने मंदीर उभे आहे. या तलावाला लक्ष्मी तलाव किंवा लक्ष्मी जलाशय म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या बाजुने या तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे. अंबाबाई मंदिराचा आज पर्यंत तीन वेळा जीर्णोद्धार झाला आहे. काही वीरगळीं सोबतच प्राचीन अंबाबाई मंदिराचे काही अवशेष आजही या मंदिर परिसरामध्ये पाहण्यास मिळतात. यंग ब्रिगेडने यापैकी काही अवशेष पुन्हा प्रकाशात आणले आहेत. मंदिरात देवी अंबाबाई बरोबरच विष्णू आणि अनंत नागाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. देवी अंबाबाईची मूर्ती समभंगातील असून तिने गदा, ढाल पानपात्र अशी आयुधे धारण केली आहेत. ही मूर्ती कोल्हापूरच्या अंबाबाई प्रमाणेच असली तरी महाळुंगाच्या जागी देवीने हातात मोदक घेतलेला आहे. हे मंदिर बीडच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईला आपली आराध्य देवता मानणाऱ्या शिलाहारांनी आपली राजधानी असणाऱ्या कसबा बीडमध्ये अंबाबाईचे मंदिर उभारल्याचे मानले जाते. त्यामुळे या मंदिरास कोल्हापूरच्या अंबाबाईचे एक पीठ म्हणून गावात मान्यता आहे.
गावात श्री देवी अंबाबाई श्री बीडेश्वर महादेवची पत्नी म्हणून पूजले जाते. या देवी बाबत गावात एक अख्यायिका रूढ आहे. नवरात्री काळात आपला योग्य तो मान राखला गेला नाही म्हणून भगवान बीडेश्वरावर नाराज होऊन देवी अंबाबाई ही मुख्य मंदिरातून आता असणाऱ्या लक्ष्मी तलावाकाठी जाऊन विराजमान झाल्या आणि तिथेच त्यांनी आपले स्थान निर्माण केले. ही बाब जेव्हा श्री बीडेश्वरांना समजली तेव्हा ते आपल्या सर्व लवाजम्यासह देवी अंबाबाईची समजुत काढण्यासाठी त्यांच्या दारी गेले. देवी अंबाबाईनी बीडेश्वरांना प्रती वर्षी नवरात्रीस माझ्या दारी येवुन मला सन्मानाने घेवुन जाण्याची अट घातली. श्री बीडेश्वरांनी देखील पत्नीच्या शब्दाचा मान ठेवता ती अट मान्य केली आणि त्यांची समजुत घालुन देवींना नवरात्री उत्सव काळात आपल्या सोबत पालखीचा मान दिला. आपला शब्द राखत प्रती वर्षी शारदीय नवरात्री काळात अश्विन शुद्ध पंचमीला आणि अश्विन शुद्ध अष्टमी जागराला स्वतः श्री बीडेश्वर महादेव आपल्या पत्नीला आणण्यासाठी संपूर्ण लव्याजमासह तिच्या दारी जातात. त्यानंतरच देवी अंबाबाई आपल्या पालखीतुन बीडेश्वर महाली प्रस्थान करतात. पंचमी आणि अष्टमीला देवी उत्सव संपन्न झाल्यानंतर त्या माघारी जातात.
खंडेमहानवमीला प्रथम देवी अंबाबाई यांचे आगमन होते. आपल्या पत्नीच्या प्रतिक्षेत असणारे श्री बीडेश्वर महादेव देवींन सामोरे गेल्या नंतर दोन्ही पालखी रूद्रप्रयाग संगमी जलाभिषेकास प्रस्थान करतात. अखंड हरिनाम गजरात हे पती पत्नी एकत्र बीडेश्वर महाली परत येतात. खंडेमहानवमीला देवी अंबाबाई ह्या बीडेश्वर महाली मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी सीमोलंघन झाल्यानंतर त्या श्री बीडेश्वरांचा निरोप घेऊन आपल्या स्थानी परत जातात.
अशी ही पती पत्नीच्या निस्वार्थ प्रेमावर आधारित आख्यायिका गेली अनेक दशके कसबा बीड गावात प्रचलित आहे. वर्षानुवर्षे देवी अंबाबाई श्री बीडेश्वर महादेवां इतकाच आदर राखला जातो आहे. या देवी अंबाबाईच्या पालखीचा मान हा गावातील आंबी आणि सुतार या परिवारांकडे वर्षानुवर्षे परंपरागत चालत आला आहे. तर पूजेचा मान हा गावातील गुरव परिवार आणि शहाजी सूर्यवंशी यांच्या परिवाराकडे आहे. प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ ही दिवस देवीची अलंकारीत पूजा मांडण्यात येते.
श्री बीडेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या लहान शिवमंदिरात एका चबुतऱ्यावर तीन शिल्प विराजमान आहेत. यातील उजव्या बाजूची मूर्ती ही श्री करवीर निवासिनी अंबाबाईची समभंगातील प्रतिकृती आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई प्रमाणेच महाळुंग, गदा, खेटक व पानपात्र धारण करणारी ही चतुर्भुज मूर्ती गावात खोकळूबाई म्हणून ओळखली जाते. लहान मुलांना खोकला झाल्यावर त्यावर उपाय म्हणून तिच्यासमोर कापूर लावून तिचा अंगारा लहान मुलांना लावला जातो. करवीर निवासिनी अंबाबाईच्या खूप कमी प्रतिकृती आज उपलब्ध आहेत. यापैकी एक कसबा बीड गावात असणे ही गावासाठी अभिमानाची बाब आहे.
श्री देवी अंबाबाई
● आदिशक्ती देवी पार्वती ●
देवी पार्वती या हिमालय व मेना यांच्या कन्या आणि भगवान शंकराची पत्नी म्हणून प्रसिद्ध आहेत. सिंह वाहन असणाऱ्या पार्वती देवींना अंबिका, उमा, गौरी, ईश्वरी, भैरवी, काली, दुर्गा, कात्यायनी, चामुंडा, भवानी इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. या देवींना आपण त्यांचे अवतारी रूप मानतो. कार्तिकेय, गजानन हे देवींचे पुत्र असून बाण व वीरभद्र यांनाही त्यांनी आपले पुत्र मानले आहे. आदिशक्ती देवी पार्वतींची स्वतंत्र मंदिरे अत्यल्प आहेत. देवी पार्वतींच्या स्वतंत्र मुर्तीस चतुर्भुज तर शिवशंकरा सोबत त्यांना द्विभुज दाखवले जाते.
अशाच अनेक द्विभुज पार्वतीच्या मूर्ती कसबा बीड गावात आढळतात. श्री बीडेश्वर महादेव मंदिर प्राकारात प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला एक उमामहेश्वराचे शिल्प दिसते. हे शिल्प खंडित असले तरी उपलब्ध भागाचे कोरीव काम अतिशय उत्तम आहे. हा खंडीत भाग पाहता संपूर्ण मूर्ती ही साधारण पाच फूट असावी असा अंदाज वर्तवला जातो. यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला गाभार्यात एक अलिंगण मुद्रेतील उमाशंकराचे शिल्प दिसते. या शिल्पात चतुर्भुज भगवान शिवशंकरांच्या डाव्या बाजूला देवी पार्वतींना दाखवण्यात आले आहे. श्री शंकरांनी आपला डावा हात उमाच्या कमरेभोवती ठेवला असून त्यांच्या माना एकमेकांकडे झुकल्या आहेत. या शिल्पाच्या खाली नंदी विराजमान झाले आहेत. मुख्य मंदिराच्या शेजारी असणाऱ्या लहान शिव मंदिरामध्ये एका चबुतऱ्यावर तीन पुरातन शिल्प आढळतात. त्यांच्या मध्यभागी एक आलिंगन मुद्रेतील उमामहेश्वराचे यांचे शिल्प आहे. या शिल्पावर शिवपार्वती, गजानन, कार्तिकेय आणि नंदी असा शिव परिवार दर्शविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या काही मूर्ती रानबाव या ठिकाणी देखील आढळून येतात. हजारो वर्षे उन वारा झेलणाऱ्या या मूर्ती आता जीर्ण झाल्या आहेत.
श्री देवी पार्वती
● श्री देवी गजलक्ष्मी ●
गजलक्ष्मी ही अशी देवता आहे जी बौद्ध, जैन आणि हिंदू संस्कृती मध्ये पूजनीय आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये या देवाचा संबंध हा गौतम बुद्धांच्या जन्मासोबत जोडला गेला आहे. तर हिंदु संस्कतीत ही अष्टलक्ष्मींपैकी एक असुन हत्तींसह असणारी, कमळात बसलेली लक्ष्मी म्हणून हिला गजलक्ष्मी असे संबोधले जाते. कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन घागरी, ते हत्ती घागरीमधले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. हिलाच अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे संबोधले जाते. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. तद्वत लक्ष्मीचा पृथ्वीशी आणि हत्तींचा मेघाशी संबंध जोडलेला बघायला मिळतो. गजलक्ष्मीच्या शिल्पांकणाची प्राचीनता बौद्ध काळापर्यंत मागे जाते. कुषाण काळापासून राष्ट्रकुट, शिलाहार, कलचुरी ते थेट यादव काळापर्यंत सर्वच राजकुलांनी गजलक्ष्मीला उपास्य दैवत मानले. राष्ट्रकुटांची तर ती राजचिन्हावर स्थानापन्न झालेली देवी होती.
या राष्ट्रकुटांचे मांडलिकत्व पत्करून उदयाला आलेल्या शिलाहार राजवंशाला देखील गजलक्ष्मीस आपले आद्य दैवत मानले आहे. शिलाहार शासित राज्यावर राष्ट्रकुटांचा विशेष प्रभाव होता. या शिलाहारांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात राष्ट्रकुट राजवटीच्या राजचिन्हाचा संकेत करणारे गजलक्ष्मीचे शिल्प आढळते. श्री बीडेश्वर महादेव मंदीराच्या प्राकारात प्रवेश करताच डाव्या बाजुच्या चबुतऱ्यावर हे शिल्प विराजमान आहे. या शिल्पाच्या तळाशी चार परिवार देवातांचे शिल्पाकंण करण्यात आले आहे. या परिवार देवतांमुळे हे शिल्प गावात सापडणाऱ्या इतर गजलक्ष्मी शिल्पांपेक्षा वेगळे आहे हे लक्षात येते.
श्री बीडेश्वर महादेव मंदीराच्या आग्नेयेला असणाऱ्या ज्ञानेश्वर मंडपात गावातील सर्वात मोठे गजलक्ष्मीचे शिल्प आढळते. स्थानिक भाषेत या देवीला भावेश्वरी किंवा भावकाई या नावाने ओळखले जाते. या शिल्पावर देवी पद्मासनात बसलेली असून ती द्विभुजा आहे. तिच्या दोन्ही हातात कमळाच्या कळ्या आहेत. देवीच्या मस्तकावर किरीट गळ्यात एक लहान व एक मोठी अशा दोन माळा, पायात तोडे असे अलंकार आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना स्तंभावर उभे असलेले हत्ती देवीच्या मस्तकावर कलशातून अभिषेक करत आहेत. प्रतिवर्षी उत्तम पाऊस व्हावा आणि शेतीला चांगले पीक यावे यासाठी देवीची आराधना केली जाते. साधारण जून महिन्यात पेरणीच्या दिवसात आणि जुलै महिन्यात देवीला नैवेद्य अर्पन केला जातो. या नैवेद्यास भावीचा नैवद्य असे म्हणले जाते. गावात गजलक्ष्मीची अशी शिल्पे अनेक ठिकाणी आढळतात यापैकी चव्हाण पानंद येथील विस्मृतीत गेलेले देवीचे स्थान यंग ब्रिगेडने पुन्हा प्रकाशात आणले आहे.
श्री देवी गजलक्ष्मी
● श्री महिषासुर मर्दिनी ●
देवी महिषासुर मर्दिनीस असुर राज महिषासुराचा काळ मानले जाते. महिषासुराने जपतप करून देवतांकडुन सदैव अजेय राहण्याचे वरदान प्राप्त केले. या वरदानाच्या बळावर बलशाली महिषासुराने आपल्या राज्याची सिमा थेट देवलोकाला भिडवली. त्याने सुर्य, इंद, अग्नी, वायू, वरूण इत्यादी देवांचा परावभ केला आणि स्वर्ग लोकांवर आपले अधिपत्य स्थापित केले. महिषासुराच्या प्रकोपाला घाबरून ब्रम्ह, विष्णू सहित देवादिकांनी देवी दुर्गेची आराधना केली. सर्व देवांनी आपली शस्त्रे दुर्गेला अर्पण केली आणि देवी दुर्गा सर्व देवांवर प्रसन्न होवून ती पृथ्वी लोकी पोहोचली. महिषासुरा सोबत तीचे नऊ दिवस युद्ध चालले यांत देवीने अनेक अवतार घेतले. दहाव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि ती महिषासुर मर्दिनी ठरली. तिच्या या युध्द विजया प्रित्यर्थच नवरात्री उत्सव साजरा केला जातो. देवी महिषासुर मर्दिनीच्या महिषासुर वधाच्या अनेक प्रतिकात्मक मुर्ती संपूर्ण भारत वर्षात दिसुन येतात.
शक्ती उपासक शिलाहार राजवंशाची राजधानी असणाऱ्या कसबा बीड गावात देखील अशा अनेक मुर्ती आढळुन येतात. कसबा बीडातील श्री बीडेश्वर महादेव मंदीरालगत असणाऱ्या लहान शिव मंदीरात एका चबुतऱ्यावर तीन मुर्ती विराजमान आहेत. यांत डाव्या बाजुला त्रिभंग अवस्थेतील चतुर्भुज महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे. या शिल्पावर देवीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर असुन डाव्या हाताने त्याचे केस पकडुन उजव्या हातातील त्रिशुळाने तीने त्याच्या मानेवर वार केला आहे, असे शिल्पांकण आहे. अशाच प्रकारची महिषासुर मर्दिनीची दोन शिल्पे गावातील मगदूम कुटुंबाच्या एका छोट्या मंदीरात आढळतात. येथे उजव्या बाजूला त्रिभंग अवस्थेतील तर डाव्या बाजुला समभंगातील चतुर्भुज महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे. स्थानिक भाषेत या देवीला तुकाई या नावाने ओळखले जाते. ही तुकाई कसबा बीडच्या ग्रामदेवतांपैकी एक आहे. नवरात्री काळात तुकाईस विशेष मान आहे. गावात या महिषासुर मर्दिनीस तुकाई म्हणण्याचा नेमका उलघडा होत नसला तरी रामायनातील अख्यायिकेप्रमाणे देवी पार्वतीलाच तुकाई मानले जाते.
श्री देवी महिषासुरमर्दिनी
• श्री देवी शारजाई •
गावातील बेंदाड (पाटील मळा) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी श्री देवी शारजाईचे स्थान आहे. रेडेलक्ष्मी, तुकाई, भावकाई , मरगाई, तामजाई , अशा देवी प्रमाणे देवी शारजाई देखील कसबा बीडच्या मूळ देवतापैकी एक आहेत. प्रति वर्षी देवी शारजाई यांना गावाच्या भरभराटीसाठी नैवेद्य अर्पण केला जातो.
● श्री देवी दुर्गा ●
दुर्गेला आदिशक्ती पार्वती मातेचाच अवतार मानले जाते. दुर्गा देवीचे वर्णन मुळ शक्ती, प्रबळ स्वभाव, सद्गुण योगमय, बुद्धीची आई आणि विकार नाशक असे केले जाते. ती अंधार आणि अज्ञान नामक राक्षसा पासुन संरक्षण आणि उपकारकर्ता आहे. महान असुर नायक दुर्गामासुराचा निःपात करण्यासाठी देवी पार्वतीने आधी शताक्षीचे रूप धारण केले आणि नंतर तीने शंखधारी शाकंभरी देवीचे रूप घेतले आणि त्यांनी दुर्गामासुराचा वध केला. दुर्गामासुराचा काळ म्हणून देवीस श्री दुर्गा हे नाव प्राप्त झाले आणि ती दुर्गेच्या रूपात पुजले जाऊ लागले. देवी दुर्गा ही सिंहारूढ असुन तिला नेहमी अष्टभुजा दाखवले जाते. तिच्या आठही हातात काही ना काही शस्त्र धारण केलेले आहे.
दुर्गा हे भगवान शिवाची पत्नी आदिशक्तीचे रूप आणि तिची मुर्ती शक्ती उपासक शिलाहारांच्या राजधानीत नसेल तर नवलच. शिलाहार राजधानी कसबा बीड मध्ये श्री दुर्गेचे समभंगातील अष्टभुजा शिल्प आढळते. श्री बीडेश्वर मंदीर प्राकारात प्रवेश करताच डाव्या बाजुच्या एका चबुतऱ्यावर हे शिल्प ठेवण्यात आले आहे. सदर शिल्प खंडीत असले तरी त्यावरील शिल्पांकण अतिशय सुरेख आहे. या देवीच्या मस्तकावर किरीट, गळ्यात एक लहान व एक मोठी अशा दोन माळा, पायेत तोडे असे देवीच्या अंगप्रत्यंगावरील अलंकार अत्यंत बारकाईने कोरण्यात आले आहेत. देवीच्या पायाशी डाव्या बाजुला गरूड तर उजव्या बाजुला मेंढा यांचे शिल्पांकण करण्यात आले आहे. या शिल्पावरून शिलाहार कालीन कारागिरांचे शिल्पकलेतील कसब लक्षात येते.
श्री देवी दुर्गा
● श्री देवी सरस्वती (गायत्री) ●
हिंदु संस्कृती मध्ये देवी सरस्वतीस ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी मानले जाते. देवी सरस्वती ही ब्रम्ह देवाची पत्नी असुन ती पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. तिला शारदा, शतरूपा, विनावादीनी, भारती इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. देवी सरस्वतीचे वाहन हंस आहे पण जैन पुराणांमध्ये आणि लोककथांमध्ये तिचे वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. अनेक चित्रांत सरस्वतीस शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात.
देवी सरस्वतीच्या अवतारास गायत्री असे म्हटले जाते. देवी गायत्रीस सावित्री आणि वेदमाता मानले जाते. पुराणात गायत्रीला ब्रह्मदेवाचे दुसरी पत्नी आणि सरस्वतीचा अवतार म्हणून उल्लेख आला आहे. गायत्री देवता प्रातःकाळी बाल्यावस्थेत, माध्यान्ह काळी युवा अवस्थेत व सायंकाळी वृद्धावस्थेत असते. या देवीचेही वाहन हंस असून तिने शंख, चक्र, पद्मा, परशु, गदा, पाश अशी आयुधे धारण केली आहेत.
ज्ञान, विद्या आणि कलेचे उपासक असणाऱ्या शिलाहारांच्या राजधानीत देखील श्री देवी सरस्वती आणि गायत्री यांच्या स्वतंत्र मूर्ती आढळतात. कसबा बीडच्या मुख्य चौकात श्री ज्योतिबा मंदिरामध्ये एका चबुतऱ्यावर देवी सरस्वती आणि देवी गायत्री या विराजमान आहेत. मंदीरात डाव्या बाजूला सरस्वतीची चतुर्भुज बैठी मूर्ती ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती साधारण बाराव्या शतकातील असल्याचे मानले जाते. कालौघात मुर्तीची बरीचशी झीज झाली असली तरी त्यावरील कोरीव काम म्हणजे कलेचा अद्भूत नमुना आहे. या शिल्पावर किरीट, अंगावर मोठी माळ, पायात तोडे, हाती विना इत्यादी दर्शविण्यात आले आहे. या मंदीराच्या उजव्या बाजूला देवी गायत्रीची त्रिमुखी मूर्ती ठेवण्यात आली आहे. सदर मूर्ती अतिशय जीर्ण अवस्थेत असुन ती बाराव्या शतकाच्या पूर्वीची असल्याचे मानले जाते. या शिल्पावर विविध अलंकार, गदा व परशु अशी आयुधे यांचे अंकन दिसते.
श्री देवी सरस्वती
• सप्तमात्रुका •
सप्तमातृका हा हिंदू धर्मातील सात देवींचा एक समूह आहे. यात आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. ह्या सप्तमात्रुका म्हणजे प्रमुख पुरुष देवतांची स्त्री शक्ती रूपे आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेय पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी, वराह अवतारापासून वाराही आणि चामुंडा अशा ह्या सप्तमात्रुका पुजल्या जातात. आपल्या गावात असे दोन सप्तमात्रुकापट्ट आढळतात. यावर सर्व देवींच्या वाहनांचे ही अंकण करण्यात आले आहे.
● श्री देवी रेणुका ●
श्री देवी रेणुका ही इक्ष्वांकु वंशातील रेणु राजाची कन्या, जमदग्नी ॠषीची पत्नी आणि परशुरामांची माता होय. रेणुका देवीस यल्लम्मा, जोगम्मा, मरिअम्मा, महाकाली, जगदम्बिका इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. रेणुका देवीचा एक हात हा अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशातही देवीचे उपासक आहेत. या रेणुका मातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. देवी रेणुका ही आपल्या परिवारासह सौंदत्ती येथे राहत असे. रेणुका आणि जमदग्नी यांना वसु, विश्वावसु, रुमण्वत, सुषेण आणि रंभद्रा असे पाच पुत्र होते. यापैकी रंभद्रा हाच परशुराम होय. बापाच्या आज्ञपोटी परशुरामाने आपल्या मातेचा म्हणजेच रेणुकेचा शिरच्छेद केला. यावेळी रेणुकेचे धड हे सौंदत्तीस तर शिर हे माहुर या ठिकाणी पडले. म्हणून माहुर या ठिकाणी रेणुका मातेचे फक्त शिर पूजिले जाते ज्यास तांदळा असे म्हणतात. सौंदत्तीला रेणुका आपल्या परिवारासह राहिली असल्याने तेथील देवीस परिवार देवता म्हणून ओळखले जाते.
शिलाहार राजधानी कसबा बीड मधील इंद्रजित पाटील यांच्या वाड्यात सौंदत्तीची परिवार देवता रेणुकेचे स्थान आहे. पाटील परिवार वंशपरंपरेने देवीची पुजा अर्चा करत आला आहे. या परिवारात पंचक्रोशीत देवकाका म्हणून प्रसिद्ध श्री परशुराम विठ्ठल पाटील हे मोठे सद्गृहस्थ होऊन गेले. पंचक्रोशीतील भक्तगण देवकाकांच्या मार्गदर्शनासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी येथे येत असत. या पाटील वाड्याच्या देवघरामध्ये रेणुका देवी विराजमान आहे. या देवीच्या डाव्या बाजुला देवी लक्ष्मीची पुजा करण्यात येते. समोर दोन सुळे असलेल्या जडावा पुजण्यात आल्या आहेत. देवकाकांच्या अंगी देवाचा संचार झाल्यानंतर ते तासनतास या सुळ्यांवर उभे राहत असत. या सुळ्यांवर उभे राहुनच लोकांना मार्गदर्शन करत असत. आजही या जडावा मोठ्या आस्थेने पुजल्या जातात. इंद्रजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातुन प्रतिवर्षी गावातील भक्तगणांना सौंदत्तीची यशस्वी यात्रा घडवली जाते. याशिवाय गावात प्रती वर्षी नित्यनियमाने रेणुका मातेचा जागर आयोजित केला जातो.
श्री देवी रेणुका
संदर्भ -
कसबा बीड एक ऐतिहासिक नगर
: डाॅ. आनंद दामले.
सुरज संजय तिबीले
यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड
मो. नं. : 9503973234
ईमेल आयडी : tibilesuraj7@gmail.com