Saturday, 10 July 2021

श्री श्रेत्र सातेरी महादेव



          कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवर सातेरी महादेव ही टेकड्यांची रांग स्थित आहे. पुर्व - पश्चिम पसरलेल्या ह्या या रांगेमध्ये साधारणतः वीस ते बावीस लहान मोठ्या टेकड्या आहेत. पूर्वेकडील सर्वांत शेवटची टेकडी म्हणजेच महादेव टेकडी. याच महादेव डोंगरावर श्री महादेवाचे पवित्र स्थान आहे. संपूर्ण कातळात कोरलेले मंदीर, नंदी, खोल्या, पायऱ्या, गुहा आणि विहीर हे या स्थानाचे खास वैशिष्ट्य.



            या डोंगरावर आल्या नंतर प्रथम आपल्याला दिसतो तो साधारण पाच फुट उंचीचा संपूर्ण कातळात कोरलेला नंदी. हा नंदी बसलेल्या स्थितीत असुन त्याचा रोख आग्नेय दिशेस आहे. या नंदीची आभुषणे ही कातळात अगदी उत्तमरितीने कोरण्यात आली आहेत. यानंतर पुढे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. पुर्वी या पायऱ्या गुडघ्याएवढ्या उंच एखाद्या गडाला साजेशा होत्या. सध्या या पायर्‍या लहान आणि चढण्यास सोयीस्कर बनवण्यात आल्या आहेत.



          पायर्‍यांवरून वर जाता जाता डाव्या बाजूला आपणांस एक विहीर दिसते. अंदाजे 30 ते 40 फुट खोल ही विहीर सध्या रिकामीच आहे. पुर्वी वर डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी कातळातील भेगांमुळे या विहीरीत साठवले जात होते. काही वर्षांपूर्वी या डोंगरावर ही विहीर एकमात्र पाण्याचा स्त्रोत होती. पण वर ब्लाॅक बसवल्यानंतर ही विहीर कोरडीच राहिली आहे. या विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली दिसते. तर त्याच्या आत ठिकठिकाणी खोबण्या करण्यात आल्या आहेत.



          इथुन पुन्हा आपण वर आलो की आपणांस दिसते ते श्री. महादेव मंदिर. पुर्वाभिमुख असणारे हे मंदीर कातळात कोरलेल्या गुहेमध्ये वसले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. या शिवलिंगावर वेटोळे घातलेल्या नागाची पितळेची मुर्ती नंतर बसवण्यात आली आहे. तर याच्या मागे श्री. शंकराचे आयुध त्रिशुळ ठेवण्यात आले आहे. या गुहेच्या छतावर अगदी मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते. तीन स्तरांची ही रचना एखाद्या फुलाप्रमाणे दिसते. कालौघात त्याची बरीच झिज झालेली आहे.



           दर्शन घेवून आपण बाहेर आल्यानंतर या गुहेच्या मागे अजुन दोन प्रवेशद्वार आपणांस दिसतात. उजव्या बाजुने आत प्रवेश केल्यानंतर समोरच एका दिवळीवजा जागेत आपल्याला श्री. गणेशाची मुर्ती दिसते. ही संगमरवरी मुर्ती अलिकडच्या काळातच स्थापण करण्यात आली आहे. इथुन उजव्या बाजुने आत जाताच समोर आपणांस दर्शन होते ते आदिशक्ती पार्वती मातेचे. ही सर्वांत आतील गुहा. या गुहेच्या भिंतीवरच पार्वती मातेची सुरेख छाया कोरण्यात आली आहे. याच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी ओट्याप्रमाणे रचना आहे. तर डाव्या बाजुस एका दिवळीची रचना आहे. गुहेच्या या भागाचे वातावरण सर्वांत शीत आढळते. बाहेर कितीही कडक उन जरी असले तरी आतील गारवा कमी होतं नाही ही याची खासियत आहे.



          बाहेर आल्यानंतर ठिक महादेव मंदीराच्या समोर उभे राहिल्यास तेथुन कोल्हापूर शहरासह आसपासची सर्व गावे दृष्टीस पडतात. याशिवाय इथुन जोतिबा डोंगर, पन्हाळा, पावनगड, मसाई पठार, तुमजाई पठार इ. अनेक ठिकाणे दृष्टीस पडतात. तर या मंदिराच्या मागे आल्यास इथुन राधानगरी तालुक्याचा पुर्व भाग दृष्टीस पडतो. यांत राधानगरीचा जंगल परिसर, डोंगर रांग, धामोडचा तुळशी  जलाशय, केळोशी जलाशय इत्यादीचा समावेश होतो.

          या सातेरी महादेव टेकडीवरून तुळशी नदी, भोगावती नदी, कुंभी नदी यांचे प्रवाह तसेच त्यांचे संगम देखील पहायला मिळतात. पावसाळ्यात या नद्यांचे पाणी वाढल्या नंतर त्यांचे प्रवाह हे स्पष्ट दिसतात. शिवाय संपूर्ण परिसराच्या पुर परिस्थितीवर लक्ष ठेवणे सोयीस्कर होते. नद्यांना आलेल्या ह्या पुरांचे दृष्य येथुन विलोभनीय दिसते. तसेच रात्रीच्या अंधारात कोल्हापूर शहरासह, आसपासच्या गावात लागणाऱ्या विजेच्या दिव्यांचे दृष्यही सुंदर दिसते.



           महादेव डोंगराच्या पश्चिम बाजुने खाली जाताना अनेक गुहा दृष्टीस पडतात. या गुहा नैसर्गिक असुन अनेक वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने त्या तयार झाल्या आहेत. एकाच वेळी अनेक लोक निवांत बसु शकतील अशा गुहा महादेव डोंगरच्या दक्षिण दिशेस आहेत. तेथे वाढलेल्या झाडीमुळे त्या झाकोळल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक गुहा या सातेरी-महादेव डोंगर रांगेतील टेकड्यावर दिसुन येतात.



         या सातेरी-महादेव डोंगराची बाबत आणखी एक गोष्ट प्रचलित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हा भाग काटेरी झुडपे आणि वनराईने भरलेला होता. या भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊन या परिसरामध्ये सक्रिय असणारी त्याकाळची कुविख्यात दरोडेखोरांची एक टोळी या महादेव डोंगराच्या आश्रयाला राहत होती. महादेव डोंगर हा त्यांचा मुख्य तळ मानला जात असे. येथील गुहा आणि पावसाळ्यात विहिरीमध्ये साचलेल्या पाण्याच्या बळावर काही काळ हे दरोडेखोर येथे वास्तव्य करत होते. एवढ्या उंचावरुन खालच्या भागावर त्यांना लक्ष ठेवणे चांगलेच सोईस्कर होते. कालांतराने ही टोळी निष्क्रिय झाली आणि त्यांनी आपली हे स्थान सोडून दिले.

            या महादेव डोंगरापासुन सुरू होणारी ही सातेरी-महादेव डोंगर रांग पुर्व-पश्चिम दिशेस पसरलेली दिसते. या रांगेमध्ये वीस ते बावीस लहानमोठ्या टेकड्या असलेल्या आढळतात. यातील काही टेकड्यांपर्यंत गाडीवाट गेलेली आहे. या टेकड्यांवर आपल्याला अनेक भौगोलिक रचना आढळतात. याशिवाय येथे काजु, आंबा, करवंद, जांभुळ असा विविध प्रकारचा रानमेवा या टेकड्यांवर आपणांस चाखण्यास मिळतो. येथील दुर्मीळ वनराई पर्यटकाचे लक्ष लगेच वेधुन घेते. विविध प्रकारची डोंगरी फुले याठिकाणी पाहण्यास मिळतात. शिवाय येथे ससा, रानमांजर, मुंगुस, अनेक जातीचे साप, विविध फुलपाखरे अशा प्रकारची जीवसंस्था आढळते. पावसाळी भ्रमंतीसाठी या टेकड्या एक उत्तम पर्याय आहे. गेली दोन वर्षे यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना येथे ट्रेकिंगचे आयोजन करते आहे.







             महादेव डोंगराच्या पायथ्याशी श्री सातेरी देवीचे वास्तव्य आहे. या ठिकाणी आपल्याला एक छोटेखानी मंदीर आढळते. मुळ मंदीराच्या समोर आता एक सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभामंडपात मध्यभागी काही लहान पादुकांच्या जोड्या ठेवलेल्या आपणांस दिसतात. या पादुका सातेरी देवीसाठी अतिशय पवित्र मानल्या जातात. यांतील मुळ सात जोड्यांची नित्यनियमाने पुजा केली जाते. सभामंडपातुन आत गेल्यास मुळ मंदीर लागते. आकाराने छोटा असणारा हा गाभारा हेमाडपंती बांधकामाचा आहे. कालांतराने त्याला बाहेरून गिलावा करण्यात आला आहे. या गाभार्‍यात एकुण सात देवींची पुजा केलेली दिसते. सात असमान दगडांना देवीच्या रूपात येथे पुजले जाते. या मुर्तींची रचना ही विशिष्ट आहे. मोठ्या पासुन लहानापर्यंत लावण्यात आलेले हे दगड सात बहिणींच्या वयातील अंतर दर्शवतात. साधारणपणे देवी पार्वतीच्या सात रूपांना सातेरी देवींच्या रूपात पुजले जाते. अशी सातेरी देवीची मंदिरे मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोंकण आणि उत्तर कर्नाटक ह्या भागात अधिक आढळुन येतात. पण या मंदिराविषयी एक खास अख्यायिका आपणांस स्थानिकाकडुन ऐकण्यास मिळते.

          अज्ञात काळी सध्याच्या कसबा बीड परिसरामध्ये एक अनामिक दांपत्य राहत होते. या दांपत्यास एकुण सात मुली होत्या. काही कारणवश या मुलींच्या आईचे निधन झाले. त्यामुळे साऱ्या मुलींचा भार एकट्या बापावर येऊन पडला. काही काळानंतर त्याला त्या मुलींचा सांभाळ करणे असह्य झाले. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी त्याने मुलींना फिरवण्याच्या बहाण्याने सातेरी येथील घनदाट जंगलात आणले. त्या काळी सातेरीवर निबिड अरण्य होते असे म्हणले जाते. या जंगलात व्याघ्रादी श्वापद वास करत होती. सध्याच्या सातेरी मंदिराच्या ठिकाणी येताच या सात मुलींना तेथे बसवून भरल्या मनाने बाप माघारी परतला. रात्रीच्या किरर अंधारात त्या मुली घाबरून गेल्या होत्या. जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा आवाजाने त्या अधिकच भेदरल्या. आपल्या बापाची वाट पाहता पाहता त्या या रात्रीच निसर्गात विलीन झाल्या. याच ठिकाणी या निसर्गाने या सात मुलींना आपल्यात सामावून घेतले. याच सात मुली पुढे सातेरी देवी म्हणजेच सात देवीच्या रूपात येथे पुजल्या जाऊ लागल्या.



          सातेरी देवीचे मूळ मंदिर हे फार जुने असून येथे अनेक प्राचीन अवशेष आजही आढळतात. मंदिराच्या बाहेरच काही कोरीव अवशेष ठेवलेले दिसतात. तर या मंदिराच्या मागे दोन विरगळ असून ते खंडित आहेत. एका वीरगळीचा फक्त युद्ध प्रसंगाचा भाग उपलब्ध आहे. तर दुसरी वीरगळ खंडित असली तरी त्याचे सर्व भाग उपलब्ध आहेत. ही वीरगळ चार स्तरीय असून यावर गाई-गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराचे अंकण पहायला मिळते. या वीरगळचा सर्वात खालचा टप्पा हा गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराला दर्शवतो. दुसऱ्या टप्प्यावर युद्धप्रसंग कोरण्यात आला आहे. तिसरा टप्पा वीराला स्वर्गी नेणाऱ्या अप्सरांचा आहे. तर शेवटचा चौथा टप्पा हा कैलासातील श्री शंकराच्या पूजेचा आहे. या प्रत्येक टप्प्याच्या दरम्यान आपल्याला सुरेख नक्षीकाम दिसते. प्रथमदर्शनी ही वीरगळ शिलाहार पूर्वकालीन असावी असे वाटते.



          या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्या सातेरी देवीच्या भक्तांना सातेरीची जत्रा करणे सोयीस्कर जावे यासाठी बांधण्यात आल्या आहेत. शेजारची धोंडेवाडी, केकतवाडी, आमशी, नरगेवाडी, वाघोबावाडी या गावचे भाविक प्रत्येक वर्षी सातेरी देवी ची जत्रा साजरी करतात. येथे अनेक बकरी, कोंबडे देवीस अर्पण केले जातात. याशिवाय या मंदिराच्या आसपास अनेक मोठे डेरेदार वृक्ष आणि प्रशस्त जागा असून या ठिकाणी आपणास वनभोजन किंवा अल्पोपहारचा आनंद घेता येतो.

          या मंदिरापासून खाली जाताना धोंडेवाडीला जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूस आत शेतात एक घरवजा मंदिर दिसते. या मंदिरामध्ये नागदेवाची पूजा केली जाते. एका मोठ्या दगडावर एकवीस फण्यांचा नागाचे चित्रांकन असून आमशीतील एक गृहस्थ नित्यनेमाने याची पूजा करतात. या घराच्या मागूनच सातेरी-महादेव डोंगरावर जाणारी पायवाट आहे.



          या मंदिराच्या उजव्या बाजूने जाणारी वाट वाघोबावाडी मार्गे आमशीमध्ये जाते. वाघोबावाडी हे एक लहानसे कमी लोकवस्तीचे गाव आहे. या गावाच्या वाटेवरच एक दरी वजा छोटीशी भौगोलिक रचना दिसते. पावसाळ्यात इथून वाहणारे ओढे, उंचावरून पडणारे पाणी आणि खाली उतरलेले ढग यांचे दृश्य विहंगम दिसते. या मार्गावर बरीच झाडी आढळते. वाघोबावाडी हे गाव तसे या वनराईतच दडले आहे. येथून दिसणारा नजारा तसा सुखावणारा आहे.

        येथुन खाली गेल्यास आपणास आमशी हे गाव लागते. सातेरी-महादेव डोंगरावरील श्री महादेवलाच आमशीचे ग्रामदैवत मानले जाते. डोंगरावरील सर्व व्यवस्था मुख्यता आमचीचे ग्रामस्थच पाहतात. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला आमची गाव तसेच महादेव डोंगरावर मोठी यात्रा भरवली जाते. महाशिवरात्री निमित्त आमशी गावातुन पालखी सोहळा तसेच अश्व रिंगण सोहळा योजिला जातो. याशिवाय नवरात्रीच्या काळात श्री. महादेवाचे नऊ दिवस उपवास केले जातात. या काळात आमशी वासीय येथे महादेव डोंगरावर वास्तव्यास असतात. आमशी गावचे नागरिक तसेच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने श्री शंभू-महादेव देवस्थान ट्रस्ट प्रत्येक सोमवारी येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करते. महसुली दृष्ट्या सातेरी-महादेव डोंगर धोंडेवाडी विभागात येत असला तरी हा मुख्यता आमशीचाच भाग मानला जातो. आमशी गावात एक गजलक्ष्मीचे शिलाहार कालीन मूर्ती आढळते. शिलाहार काळात आमशी हे गाव लहान वसाहतीच्या स्वरूपात अस्तित्वात असावे असा कयास वर्तवला जातो.

            या सातेरी-महादेव डोंगराच्या भोवती नरगेवाडी, केकतवाडी, धोंडेवाडी, गणेशवाडी, अशी गावे स्थित आहेत. धोंडेवाडी ते गणेश वाडी यादरम्यान आपल्याला नागमोडी वळणांचा रस्ता लागतो. या रस्त्यावरच दोन ठिकाणी पावसाळी धबधबे आपल्याला पाहण्यास मिळतात. मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर हे धबधबे प्रवाहित होतात. या धबधब्याचे कोसळणारे पाणी, वाहणारे ओढे यांचे दृष्य ही सुंदर दिसते. वरून येणारे हे पाणी खाली बांधण्यात आलेल्या पाझर तलावात साठवले जाते. खालच्या सखल भागात अलीकडच्या काळात पाझर तलाव तयार करण्यात आला आहे. यामुळे गणेशवाडी गावची काही जमीन ओलिताखाली आली आहे.

          या पाझर तलावाच्या डाव्या बाजूस आपल्याला एक अलग झालेली छोटी टेकडी दिसते. या टेकडीला स्थानिक भाषेत राळ्याची रास असे म्हटले जाते. या टेकडी विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी राळे नामक धान्याचे या भागात मोठ्या प्रमाणावर पिक घेतले जात होते. या राळ्याची मळणी या टेकडी शेजारी होत असे. या पिकाचे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असे की त्याच्या राशीच्या राशी येथे लागत असत. या पिकाचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन आणि त्याचे लागणारे मोठे ढिग याची तुलना या टेकडी सोबत केली जात असे. यावरूनच या टेकडीला राळ्याची रास हे प्रतीकात्मक नाव मिळाले आहे. आजच्या घडीला या भागात राळे हे पीक घेतले जात नसले तरी येथे भुईमूग, बाजरी, सोयाबीन, भात अशी पिके घेतली जातात.



          गणेशवाडी गाव ओलांडल्यानंतर आपणास बीडशेड ही बाजारपेठ लागते. आज येथे कापड उद्योग, हॉटेल, दवाखाने, ऑटोमोबाईल, मेडिकल, किराणामाल दुकाने अशा हरएक प्रकारची दुकाने स्थापन झाली आहेत. एक मोठी बाजारपेठ म्हणून बीडशेड उदयास येत आहे. याच्या पुढे आपणांस कसबा बीड, सावरवाडी, बहिरेश्वर अशी गावे लागतात. शिलाहार काळात अत्यंत महत्वाची असणारी ही गावे आजतागायत आपले प्राचीनत्व टिकवून आहेत.

            कोल्हापूर प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहारांनी आपली उपराजधानी आणि सैन्य तळ कसबा बीड (त्याकाळचे तीरवाड बीड) या ठिकाणी वसवला होता. सध्याच्या आरे, महे, कोगे, बहिरेश्वर, गणेशवाडी, सावरवाडी आणि कसबा बीड या गावांच्या इतकी मोठी असणारी ही राजधानी सातेरी-महादेव टेकडीवरून सहज नजरेच्या टप्प्यात येत होती. प्रथम शिलाहारांनी कराड येथुन कोल्हापूर येथे आपली राजधानी वसवली होती. कोल्हापूर ही मुख्य राजधानी असताना राजाच्या विश्रांतीचे तसेच राजधानी पासुन सुरक्षित अंतरावर सैन्य गतीविधीचे ठिकाण म्हणून कसबा बीड या गावची निवड केली होती. कसबा बीड ते कोल्हापूर यांना जोडणारा मार्ग हा आरे मार्गे जात असे. राजधानी कोल्हापूर आणि सैन्य शिबिर असणाऱ्या कसबा बीड मध्ये सतत संपर्क होत असे. या संपूर्ण मार्गावर सातेरी-महादेव डोंगरावरून लक्ष ठेवणे सोयीस्कर होते. या टेकडीवरून कोल्हापूर आणि त्याच्या पश्चिमेचा बराच परिसर नजरेस पडतो. त्यामुळे येथे राहुन राजधानीच्या जवळपासच्या सर्व हालचाली टिपणे सहज सोपे होते.

           याशिवाय कोंकणातुन येणारा व्यापारी मार्ग हा सध्याच्या घानवडे, आरळे, शिरोली, कसबा बीड, बहिरेश्वर, म्हारूळ, सांगरूळ, कोपार्डे, कळे अशा मार्गाने शिलाहारांचे मुख्य लष्करी ठाणे आणि नंतर झालेले राजधानीचे ठिकाण पन्हाळा गडाकडे जात असे. शिलाहार राजा भोज यांच्या एका ताम्रपटातही तीरवाड बीड ते पन्हाळा मार्गाचा उल्लेख आला आहे. या संपूर्ण मार्गावर सातेरी-महादेव टेकडीवरून नजर ठेवण्यास मदत होतं असे. वर उल्लेख आलेल्या व्यापारी मार्गावर अनेक टप्पे तयार करण्यात आलेले आहेत. जसे शिरोली तेथील डोंगर, सातेरी-महादेव डोंगर, सांगरूळ येथील डोंगर. या टप्प्यावरून सदर व्यापारी मार्गावर नजर ठेवली जात असे. या सर्व टप्प्यांपैकी सातेरी-महादेवाचे स्थान सर्वांत उंच आहे. या स्थानावरूनच व्यापारी मार्गावरील सर्व टेहळणीची ठिकाणे सहज दृष्टीस पडतात. आरळे-घानवडे पासुन ते पन्हाळा दुर्गापर्यंतचा पुर्ण व्यापारी मार्ग ह्या एकट्या सातेरी-महादेव डोंगरावरून नजरेस पडत होता. याशिवाय कोल्हापूर, पन्हाळा, कसबा बीड या राजशिबिरांमध्ये परस्पर संपर्क साधण्यास देखील हा डोंगर नक्कीच उपयोगी पडत असेल. प्राचीन काळाच्या अनेक क्लुप्ती वापरून महत्त्वाचे संदेश लवकरात लवकर पोहोचवणे हे आपण अनेक मालिकांमध्ये तसेच छत्रपती शिवरायांच्या युध्द नितीमध्ये पाहिले आहे. असे संदेश कोल्हापूर, पन्हाळा, कसबा बीड तसेच संपूर्ण व्यापारी मार्गावरील टेहळणी ठिकाणांवर पोहचवण्यासाठी या टेकडीचा वापर होतं असावा. इतके हे स्थान महत्त्वाचे होते.

           भौगोलिक दृष्ट्या ही या डोंगराचे आणि डोंगर रांगेचे स्थान महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात या डोंगरावरुन प्रवाहीत होणाऱ्या ओढ्यांचे पाणी खाली तयार करण्यात आलेल्या पाझर तलावांत साठवले जाते. याचा फायदा पायथ्याच्या गावांना होतो. तसेच येथील वाऱ्याची गती पाहता पवनचक्की प्रकल्पाद्वारे येथे वीज निर्मितीही होवू शकते. शिवाय जीवसंस्थेच्या आधीवासासाठी हे डोंगर महत्त्वाचे आहेत.

            श्री. श्रेत्र सातेरी-महादेव हे स्थान नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. या ठिकाणी सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, निसर्ग पर्यटन होवू शकते. या दृष्टीने येथे पर्यटन व्यवसाय वाढवला जाऊ शकतो. पर्यटन वाढीसोबतच येथे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होवू शकतात. महाशिवरात्री, नवरात्री तसेच प्रत्येक सोमवारी अनेक भाविक या ठिकाणाला भेट देत असतात. या सर्व भाविक आणि पर्यटकांसाठी येथे चांगले रस्ते, प्रसाधनगृहे, वीजेची सोय अशा प्रकारच्या सोयी होणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच या परिसरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन देखील वाढले आहे. स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष घालुन नियोजनबद्ध रितीने या जागेचा विकास करणे गरजेचे आहे. आपणही आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या कुटुंबासह येथील इतिहास, सांस्कृतिक वारसा, निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्याच. सातेरी-महादेव डोंगरासोबतच आपण या भागातील बहिरेश्वर, सावरवाडी आणि कसबा बीड या गावातील ऐतिहासिक पर्यटनही तुम्ही अनुभवू शकता. अधिक माहिती आणि गाईड साठी यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना सदैव आपल्या सेवेत तत्पर आहे.




          धन्यवाद..



सूरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. : 9503973234

ई-मेल : tibilesuraj7@gmail.com

Thursday, 17 December 2020

शिलाहार राजवंश


          या बलाढ्य दख्खनच्या पठारावर अनेक राजसत्ता उदयास आल्या. अनेक सुप्रसिद्ध राजे, राजवंश येथे घडले. यातीलच एक म्हणजे शिलाहार राजवंश. तब्बल सातव्या शतकापासुन दख्खनच्या राजपटलावर शिलाहार घराण्याचे अस्तित्व आपल्याला आढळते. शिलाहार राजे हेे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य करत असत. सुमारे तिनशेहुन अधिक वर्षे आपल्या मर्यादित राज्यात तग धरून असणारी शिलाहारांशिवाय इतर राजसत्ता आढळत नाही. 

          ● मुळ स्थान

          सातव्या शतकात शिलाहार राजे हे पुर्वकालीन चालुक्य राजांचे मांडलिक म्हणून सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (तगर) या ठिकाणी राज्य करत असत. पुर्वकालीन चालुक्यांच्या पतनानंतर काही धाडसी शिलाहार कुमारांनी पश्चिमेस आणि दक्षिणेस जात राष्ट्रकूटांच्या अधिपत्याखाली आपापली राज्ये स्थापल्याचे दिसते. उपलब्ध पुराव्यांनुसार शिलाहारांच्या एकुण सहा शाखा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यात कार्यरत होत्या. यापैकी फक्त तीन शाखा विशेष प्रसिद्ध आहेत तर तीन शाखा अज्ञात आहेत.

          या सर्व शाखांचे शिलाहार राजे स्वतःला तगरपुरेश्वर, तगरपुरपरमेश्वर (कर्नुल शाखा), तगरपुरनगराधिश्वर (एलमेल शाखा), तगरपुरवराधिश्वर (अक्कलकोट शाखा) अशी बिरूदे वापरत असत. या बिरूदांवरून ते आपले मुळ स्थान तगर चा निर्देश करतात. शिलाहारांच्या सर्वप्रथम प्रसिद्ध झालेल्या ताम्रपटाचे संपादन विल्फर्ड यांनी केले होते. त्यांनी तगर म्हणजे देवगिरी म्हणजेच दौलताबाद असावे असे अनुमान काढले होते. अशाच प्रकारे वेगवेगळ्या संशोधकांनी आपली वेगवेगळी मते मांडली. भगवानलाल इंद्रजी यांनी तगर म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे ठिकाण असावे असा अंदाज वर्तवला तर रा. गो. भांडारकर यांनी तगर हे बीड जिल्ह्यातील दारूर हे ठिकाण असावे असे मत मांडले. वि. का. राजवाडे यांनी तगर हे पुर्वीच्या हैद्राबाद संस्थानातील कणकगिरीच्या उत्तरेस असणारे तवंगीर या ठिकाणी असावे असे अनुमान काढले. डाॅ. फ्लीट यांनी सुरूवातीला करवीर म्हणजेच तगर असावे असे अनुमान काढले होते. तगर आणि करवीर ही दोन्ही एकाच फुलाची नावे आहेत आणि करवीर हे कोल्हापूरचे सध्या प्रचलित असलेले दुसरे नाव आहे यावर डाॅ. फ्लीट यांचे अनुमान आधारलेले होते. पण नंतर डाॅ. फ्लीट यांनी आपले मत बदलुन तगर हे सध्याच्या मराठवाडा विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 'तेर' हेच गाव आहे हे सप्रमाण सिद्ध केले.

          दक्षिण भारताच्या पुर्व किनाऱ्यावरील नागार्जुनकोंड, विणुकोंड, वेंगी यांसारख्या नगरांपासुन पश्चिमेस भडोच (प्राचीन नाव बॅरिगाझा) आणि उत्तरेस उज्जयिनी यांना जोडणाऱ्या मार्गावरील तगर ही प्रतिष्ठान (पैठण) आणि नाशिक याप्रमाणे एक प्रमुख बाजारपेठ होती. टाॅलेमी आणि पेरिप्लस यांनी आपल्या पुस्तकांमध्ये तगर चा उल्लेख केला आहे. पण त्यांनी निर्दिष्ट केलेल्या दिशा व अंतरे चुकली आहेत. टॉलेमीने तगर हे भडोच च्या ईशान्येस आहे असे म्हटले आहे तर पेरिप्लस तगर पैठण पासून दहा दिवसाच्या अंतरावर आहे असा निर्देश करतात. पैठण पासून तगरचे अंतर ९६ मैलाचे आहे. तेरे येथे सध्या अर्धवर्तुळाकृती पृष्ठभागाचे त्रिविक्रम मंदिर विद्यमान आहे. हे मूळचे चौथ्या शतकातले बौद्ध चैत्य असावे असा तर्क केला जातो. तसेच येथे उपलब्ध अनेक मंदिरे, लेख, मातीच्या भांड्यांचे तुकडे, मृण्मयमूर्ती आणि नाणी यावरून तेर हे अत्यंत भरभराटीचे ठीकाण असावे याचा अंदाज येतो.

उत्पत्तीकथा ●

          सर्व शिलाहार राजे आपण विद्याधर नृपती जीमुतकेतु यांचा पुत्र जीमुतवाहन यांस आपला मूळ पुरुष मानतात. मध्ययुगीन भारतीय लेखात अनेक राजवंशांची उत्पत्ती ही प्राचीन काळच्या विख्यात वंशापासुन (उदाहरणार्थ कौरव, पांडव इत्यादी पासून) किंवा एखाद्या व्यक्तीपासून (उदाहरणार्थ राम, लक्ष्मण, कर्ण इत्यादी पासून) झाली आहे असे वर्णन आढळते. त्याचप्रमाणे शिलाहार राजे आपली उत्पत्ती विद्याधर नृपती जीमुतकेतू यांचा पुत्र जीमुतवाहन ज्याने गरुडाच्या तावडीत सापडलेल्या नाग कुमार शंखचुडाला त्याच्या बदली स्वतःचा बळी देऊन मुक्त केले त्याच्या वंशात उत्पन्न झालो असा आपल्या लेखात अभिमानाने उल्लेख करतात.

          गरुडाने वासूकीला आपल्या प्रजेतून एक एक सर्प देण्यास भाग पाडले. एके दिवशी शंखचुड नामक सर्पाची पाळी आली. त्याने एका शिलेवर बसून गरुडाच्या हल्ल्याची वाट पाहायची होती. जीमुतवाहन विद्याधर कुमाराला हे पाहून फार वाईट वाटले. त्याने शंखचूड गोकर्ण येथे हे भगवान शिवाच्या दर्शनाला गेला असता त्याची जागा घेतली. तितक्यात गरुडाने तेथे येऊन जिमुतवाहनास भक्षणार्थ नेले.  त्याला अर्धामुर्धा खाल्ल्यावर गरुडाला आपली चूक कळून आली. तेव्हा जीमुतवाहनाच्या पत्नीच्या प्रार्थनेवरून पार्वतीने त्याला जिवंत केले. गरुडाने तेव्हापासून सर्प न खाण्याचे ठरवले आणि त्यापूर्वी मारलेल्या सर्व सर्पांना जीवित केले.

          ही जीमुतवाहनाची कथा मूळच्या पैशाची भाषेतील 'बृहत्कथेमध्ये' होती. तो ग्रंथ आता उपलब्ध नाही. तथापि त्याची संस्कृत रूपांतरे सोमदेवाचे 'कथासरीत्सागर' आणि मज्जरी यांच्या 'बृहत्कथा' मध्ये ती दोन ठिकाणी आली आहे. हे दोन्ही ग्रंथकार अकराव्या शतकात काश्मिरात होऊन गेले.

          उत्तर कोकण शाखेतील शिलाहार छद्वैदेवाच्या सर्वात प्राचीन ताम्रपटात या वंश नामाचे वेगळी उत्पत्ती दिली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे परशुरामाच्या बाणाने त्रस्त झालेल्या पश्‍चिम समुद्राचे रक्षण 'सिलार' नामक विराने केले म्हणून त्याच्या वंशजांना 'सिलार' नाव पडले. पण ही आख्यायिका इतरत्र आढळत नाही.

प्रमुख शिलाहार शाखा

          सातव्या शतकामध्ये चालुक्य राजवंशाच्या पतनानंतर महत्त्वाकांक्षी शिलाहार राजांनी राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून आपापली राज्य स्थापन केली. अशा प्रकारे काळानुरुप शिलाहारांच्या एकुण सहा शाखा स्थापन झाल्या. या सहा शाखांपैकी दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार या तीन शाखा विशेष प्रसिद्ध आहेत.

          सर्वप्रथम दक्षिण कोकण कोकणामध्ये शिलाहारांची शाखा स्थापन झाल्याचे दिसते. दक्षिण कोकण शाखेचा संस्थापक शिलाहार सन्ना फुल यांना राष्ट्रकूट राजा कृष्ण यांच्या कृपेने राज्य मिळाले असा उल्लेख शिलाहारांच्या ताम्रपटात आला आहे. या शाखेच्या अधिपत्याखाली सध्याचा गोवा (प्राचीन नाव सिंहल देश), सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड (प्राचीन नाव इरिडगे प्रदेश) इतका प्रदेश येत असे. सप्तकोंकण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या प्रदेशाची बलिपत्तन (खारेपाटन) ही राजधानी होती.

          त्यानंतर काही काळात उत्तर कोंकण शिलाहार शाखेचे संस्थापक प्रथम कपर्दी यांना राष्ट्रकूट सम्राट तृतीय गोविंद यांच्या कृपेने उदयास आले असावेत. उत्तर कोंकण शाखेची सत्ता ही सध्याच्या ठाणे, कुलाबा, मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्याचा काही भाग तर गुजरात राज्याच्या दक्षिण भागावर चालत असे. कवडीद्वीप किंवा पुरीकोंकण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या राज्याची राजधानी प्रथम पुरी (दंडाराजपुरी अथवा राजापुरी) आणि नंतर ठाणे (स्थानक) या ठिकाणी स्थित होती.

          कोल्हापूरचे शिलाहार बऱ्याच काळाने उदयास आलेले दिसतात. या शाखेचा मूळ पुरुष प्रथम जतिग हे गोमंथ गिरीदुर्गाचे अधिपती होते. हा गोमंत पर्वत कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात स्थित आहे. कोल्हापूर शाखेच्या शिलाहारांचे पूर्वज हे तगरहून निघाल्यानंतर काही काळ कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यात राज्य करीत होते असे दिसते. कालांतराने या शिलाहार शाखेने कोल्हापूर (प्राचीन नाव एडेनाड किंवा क्षुल्लकपुर) या प्रदेशावर आपले राज्य स्थापले असावे. या शाखेचे कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आणि दक्षिण कोंकणचा काही भाग यावर राज्य चालत असे. कुंतल देश म्हणून प्रसिद्ध या राज्याची वळवाड आणि पन्हाळा ही राजधानी होती.

भाषा आणि समाजव्यवस्था ●

          शिलाहार हे कन्नड भाषिक होते. त्यांचे मूळ स्थान तगर हे प्राचीन काळी कन्नड देशात अंतर्भूत होत असे. शिलाहार राजे कन्नड भाषिक होते हे त्यांच्या स्वतःच्या कन्नड बिरूदांवरून (उदाहरणार्थ मलगलगण्ड, गण्डरगण्ड, दण्डवड़र, नन्नीसमुद्र, मरुवक्कसर्प, इडुवरादित्य, अय्यनसिंग इत्यादी) आणि त्यांच्या प्रमुख लेखांवरून स्पष्ट दिसते. शिलाहारांचे प्रमुख लेख हे कन्नड आणि संस्कृत भाषेतच अधिक आढळतात. कोंकणातील सामान्यांची भाषा ही मराठी तर कोल्हापूर प्रदेशातील सामान्यांची भाषा ही कन्नड होती.

          शिलाहार काळात हिंदू, जैन, लिंगायत आणि बौद्ध धर्मी लोक एकत्र राहत असावेत हे उपलब्ध मंदीरे आणि अवशेषांवरून दिसते. सर्वच धर्मांना राजाश्रय होता. तर सर्व समाज हा आपल्या कार्यानुरूप विभागला गेला होता. समाजातील सर्व घटक हे परस्परांवर अवलंबून होते.

राज्य व्यवस्था 

          प्राचीन काळी राज्य शासनाच्या सोयीकरता प्रदेशाचे अनेक विभाग आणि पोटविभाग केले होते. शिलाहार राजवंशाच्या काळात सदर विभाग आणि पोटविभागांसाठी देश, विषय, खंपण/गंपण, नगर व ग्राम अशा संज्ञा प्रचलित होत्या. शिलाहार काळात कोल्हापूर प्रदेशातील सामान्य लोकांची भाषा कन्नड असल्याने तेथील विभागांची नावे ही कन्नड भाषेत तर कोंकण प्रदेशातील विभागांची नावे ही मराठी भाषेत असलेली आढळतात.

          यांत सर्वांत मोठ्या विभागाला देश ही संज्ञा वापरली जाते (उदाहरणार्थ कुंतल देश, महादेश). देशाचा पोटविभाग तो विषय. विषयांच्या शेवटी नाड किंवा खोल्ल अशी नावे जोडलेली असत (उदाहरणार्थ एडेनाड, आजिरगेखोल्ल). विषयांचे खंपण आणि गंपण या नावाचे पोटविभाग पडतात (उदाहरणार्थ मिरींजेगंपण, कोडवल्लिखंपण). त्याचे पोटविभाग म्हणजे ग्राम. याच्या शेवटी पल्लि, पल्लिका, वाड आणि ग्राम अशा संज्ञा वापरल्या जातात (उदाहरणार्थ मंचकपल्लि, चिख्यलपल्लिका, तीरवाड, बोपग्राम). शिलाहार कालीन नगरे ही स्वयंपूर्ण होती. शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा होती तर सरकारात जमा होणारा शेतासारा, व्यापारावर आकारला जाणारा कर यावर राज्यव्यवस्था चालत असे.

मंदीरे, शिल्पकला आणि नाणी

          शिलाहार राजे हे उदारमतवादी होते. शिलाहार राजवंशाच्या शासन काळात अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदीरांची स्थापना करण्यात आली. यामध्ये अंबरनाथचे शिव मंदीर, कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदीर आणि जैन मंदीर तसेच रूपनारायण मंदीर ही विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय शिलाहार नृपती हे कलेचे भोक्ते होते. शिलाहार काळात शिल्पकलेला विशेष प्रोत्साहन होते. या काळातील अनेक मंदीरे, लेणी, वीरगळ, सतीगळ, शिल्पे आणि लेख यांचे कोरीव काम हे अचंबित करणारे आहे.

          शिलाहार काळात मोठ्या प्रमाणावर सुवर्ण नाणी आणि मुद्रा तयार केल्या गेल्या. शिलाहारांच्या लेखात फणम्, बिसिगे आणि द्रम्म या नाण्यांचा उल्लेख आढळतो. फणम् किंवा पणम् हे अगदी लहान आकाराचे पाच किंवा सहा ग्रेन वजनाचे नाणे आहे. तर बिसिगे हे संस्कृत विशोपक किंवा मराठी विसोवा प्रमाणे फणम् च्या विसांश किंमतीचे नाणे असावे. अशा प्रकारची असंख्य नाणी आजतागायत प्राप्त झाली आहेत, होत आहेत.

          शिलाहार राजांच्या अनेक ताम्रपट आणि शिलालेखांवर गरूडमुद्रा आढळते. यावरून ही गरूडमुद्रा शिलाहारांची राजमुद्रा असल्याचे स्पष्ट होते. अशीच गरूडमुद्रा असणारी अनेक नाणी प्राप्त झाली आहेत. याशिवाय विविध प्राणी, वृक्ष, विविध आयुधे, टिंबे कानडी अक्षरे कोरलेली नाणी आढळतात. तसेच झुबा, अंगठी अशाप्रकारचे सुवर्णालंकार आणि सोन्याचा नाग, तार यासारख्या वस्तू सापडल्या आहेत.


संदर्भ -

२) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख

          - वासुदेव विष्णू मिराशी

३) महाराष्ट्र व गोवे शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सुची

          - शांताराम भालचंद्र देव


🙏 धन्यवाद 🙏

 

सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड 

मो. नं. ९५०३९७३२३४

ई-मेल : tibilesuraj7@gmail.com

Saturday, 26 September 2020

कोल्हापूर जिल्हा दुर्ग भ्रमंती

          महाराष्ट्राला गड-किल्ल्यांच्या स्वरूपात मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास या गडांभोवतीच रेंगाळतो. प्राचीन काळी गडकोटांची उभारणी ही मुख्यतः टेहळणी साठी केली जात असे. व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात किल्ल्यांचा वापर होत असे. कालांतराने या किल्ल्यांचे प्रदेश संरक्षणासाठीचे महत्व ओळखून हे गडकोट सामरीक दृष्ट्या सज्ज केले गेले. याच गड-किल्ल्यांवर अनेक राजसत्तांचा उदय झाला. तसेच अनेक राजसत्ता लयास ही गेल्या. या अजिंक्य आणि बेलाग गडांच्या जोरावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी स्वराज्य उभे केले. तर हे किल्ले सर करता करता सबंध भारतावर राज्य करणारी मुघल सत्ता खिळखिळी झाली.

          कोल्हापूर जिल्ह्याला देखील प्राचीन काळापासून गड-किल्ल्यांची परंपरा लाभलेली आहे. प्राचीन काळी कोल्हापूर प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहार राज्यकर्त्यांनी टेहळणीसाठी आणि आपल्या राज्याच्या रक्षणासाठी काही किल्ल्याची निर्मिती केली. यामध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड, गगनगड, शिवगड, भूदरगड, रांगणा आणि सामानगड या किल्ल्यांचा समावेश होतो. स्वराज्य निर्मिती काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी १११ किल्ल्यांची उभारणी केली असे सभासद बखर सांगते. यापैकी चार किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात महाराजांनी निर्माण केले. हे किल्ले म्हणजे महिपालगड, कलानिधीगड, गंधर्वगड, आणि पारगड. कालांतराने अठराव्या शतकात पेशवे आणि आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर शासकीय सोयीसाठी मुडागड आणि दुशाळगडाची निर्मिती झाली. अशाप्रकारे कोल्हापुर जिल्ह्यामध्ये गिरीदूर्ग आणि वनदूर्ग प्रकारातील एकूण १४ किल्ले अस्तित्वात आहेत.


● पन्हाळा ●

          कोल्हापूर शहरापासून सर्वात जवळ आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारा गड म्हणजे पन्हाळा. या गडाच्या नावावरूनच सध्याचा पन्हाळा तालुका ओळखला जातो. हा किल्ला दख्खनच्या पठारावरील सर्वांत मोठा किल्ला आहे. शिलाहार राजवंशाच्या शासन काळात हा किल्ला उभारला गेला आहे. शिलाहार राजा मारसिंह यांच्या ताम्रपटात राजा गोंक यांचा पन्नाले दुर्गाचा स्वामी असा उल्लेख येतो. शिलाहार नृपती गोंक यांनी पन्हाळ्यावर आपले लष्करी ठाणे निर्माण केले होते. कालांतराने शिलाहार राजा महामंडलेश्वर भोज यांनी पन्हाळा गडास संपूर्ण किल्ल्याचे स्वरूप दिले. त्या काळी येथे नागवंशीय लोक राहत असल्याने या गडास पन्नगनालय म्हणजे नाग लोकांचे घर असे नाव मिळाले. याचाच अपभ्रंश होऊन पन्नालय, पन्नाले, प्रणालक, पन्हाळा अशी नाव प्राप्त झाली असावी. कोल्हापूरच्या शिलाहार शाखेचे शेवटचे राजे महाराजाधिराज द्वितीय भोज यांनी आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळा दुर्गावर आणली. यादव राजा सिंघनदेव यांच्या आक्रमणा वेळी पन्हाळा गडावर अखेरची लढाई झाली. यांत शिलाहारांची हार होवून राजा द्वितीय भोज यांना याच गडावर आजन्म कैदेत ठेवण्यात आले.

          शिलाहारांच्या पाडावानंतर हा गड यादवांच्या ताब्यात गेला. नंतर बहामनी आणि आदिलशाही या मुस्लीम सत्ताधिशांकडे याचे अधिकारी राहीले. गडावरील बहुतांश वास्तुंचे बांधकाम हे आदिलशहीच्या काळात झाल्याचे आढळते. बऱ्याच वास्तु या मुस्लिम वास्तुकलेत निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सन १६५९ मध्ये अफजल वधानंतर अल्पावधीतच शिवछत्रपतींनी हा गड स्वराज्यात आणला. स्वराज्यावर चालून येणारे सिद्धी जौहर नावाचे वादळ थोपवण्यासाठी महाराजांनी याच दुर्गाची निवड केली. त्यानंतर या गडाच्या साक्षीने घडलेल्या घटना इतिहासात कायमच्या अजरामर झाल्या. मुत्सद्देगिरी, गनिमी कावा आणि मावळ्यांच्या बलिदानामुळे महाराज सुखरुप निसटले खरे पण हा गड पुन्हा आदीलशहाच्या ताब्यात गेला. मात्र सन १६७३ मध्ये सरदार कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी भेदनितीचा वापर करत हा गड पुन्हा स्वराज्यात आणला.

          स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घकाळ वास्तव्य या गडावर राहिले आहे. त्यांच्या काळात या गडास उपराजधानीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या गडाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे राजधानी व्यतिरिक्त सर्वाधिक काळ वास्तव्य या गडावर राहिले आहे. याशिवाय शिव-शंभूंच्या अखेरच्या भेटीचा पन्हाळा दुर्ग साक्षीदार आहे. तद्नंतर १७१० मध्ये करवीर संस्थानाच्या निर्माणकर्त्या छत्रपती ताराराणी यांनी हा गड आपली राजधानी म्हणून निवडला होता. छत्रपती ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) आणि छत्रपती संभाजी महाराज (तीसरे) यांच्या काळात पन्हाळा किल्ला मराठे शाहिचेे मध्यवर्ती केंद्र बनला होता. आज गडावर राजवाडा, सज्जाकोठी, राजदिंडी मार्ग, अंबरखाना, दारुगोळा कोठाराचे अवशेष, भग्न कचऱ्यांचे अवशेष, तीन दरवाजा, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, नरवीर शिवा काशीद यांची समाधी, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, संभाजी महाराज मंदीर, रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांची समाधी, अंधारबाव, चोरखिंड, वाघ दरवाजा, पुसाटी बुरुज इत्यादी पहावयास मिळते. शिवछत्रपतींच्या विशेष किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला आज देखील निसर्गाचे आणि मानवी विकृतींचे चटके सोसत मानाने उभा आहे. या किल्ल्याच्या जोडीला पावनगड हा किल्ला आहे.










● पावनगड ●

          कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारी एकमेव जोड किल्ल्यांची जोडी म्हणजे पन्हाळा आणि पावनगड किल्ले. आपल्याला जर पन्हाळगड समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी पावनगड समजून घ्यायला हवा. पन्हाळ गडाच्या संरक्षणासाठी पावन गडाचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. शिलाहार राजा गोंक यांच्या काळापासून या गडाचे अस्तित्व आढळते. गडावर आज देखील शिलाहारकालीन विहीरी आणि वास्तू असल्याचे दिसते. सिद्धी जौहर जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर चालून आला तेव्हा त्याच्या सोबत असणाऱ्या इंग्रज तोफांनी पावनगडाच्या बाजुने हल्ला केला होता. त्यामुळे सन १६७३ मध्ये पन्हाळा गड ताब्यात आल्या नंतर महाराजांनी पावनगडाचे महत्त्व ओळखून यास बुरुज, दरवाजे उभारून किल्ल्याचा साज चढवला. एक निमुळता मार्ग पावनगडास पन्हाळ्यापासुन अलग करतो. या किल्ल्यावर खोदीव आयताकृती विहीर, तूपाची विहिर, वाड्याचे अवशेष, दर्गा, काही तोफा, तटबंदी, झेंडा बुरुज इत्यादी पहावयास मिळते. सन १७०३ मध्ये पन्हाळा आणि पावनगडावर चालुन आलेल्या दस्तुरखुद्द औरंगजेबाला हा किल्ला जिंकण्यास तब्बल दोन वर्षे लागली. शेवटी १७०५ साली हा गड फितुरीने औरंगजेबाने बळकावला आणि त्याचे नामकरण रसुलगड असे केले. पण काही काळातच हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी हस्तगत केला.







● विशाळगड ●

          आंबा घाट, अनुस्कुरा घाट, राजापूर घाट, मलकापूर तसेच तळकोकणातील साखरपा, गणपतीपुळे, रत्नागिरी या ठिकाणांवर देखरेख ठेवणारा हा एक खंदा रखवालदार. कोंकणातील बंदरावरून घाटमार्गे व्यापारी माल देशावर येत असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली आहे. शिलाहार नरेश महामंडलेश्वर भोज यांच्या काळातच या गडाची उभारणी झाल्याचे मानले जाते. शिलाहार काळात या गडावर नाग लोकांची वास्तव्य होते. सुरूवातीला यांस खिलगील या नावाने ओळखले जात असे.  कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन यास खिलगिला, खिशागिला, भोजगड, खेळणा ही नावे प्राप्त झाली असावी. सन १६५९ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून या गडाचे नाव विशाळगड असे ठेवले. विशाळगडाच्या बाबतीत एक उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा सरदारांनी बहमणी सैन्याचे केलेले पारिपत्य. सन १४५३ मध्ये मलिक उत्तुजार नामक बहमणी सरदाराने शिर्क्यांचा प्रचितगड जिंकून घेतला आणि शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. यावर आम्ही धर्मांतर करू पण आमचा शत्रु असणारा शंकरराव मोरे यांस पराभूत करुन त्याचे धर्मांतर करावे आणि खेळणा किल्ला जिंकवा, यासाठी लागेल ती मदत आणि पोहोचण्याचा मार्ग दाखवु असे आमिष शिर्क्यांनी मलिक उत्तुजारला दाखवले. या आमिषाला भुलुन मलिक आपल्या सैन्यासह खेळणा गडास निघाला. दिलेल्या शब्दानुसार शिर्क्यांनी दोन दिवस संपुर्ण सैन्याला सहज सोप्या मार्गावरून नेले. पण नंतर त्यांनी बहमणी सैन्यास अतिशय दाट जंगलात आणले. सपाटीवर लढणाची सवय असणाऱ्या बहमणी सैन्याचे या घनदाट जंगलाने अतोनात हाल केले. अशातच मलिक उत्तुजार हा आजारी पडला आणि त्याला सैन्याला आदेश देणे ही मुश्किल बनले. बहमणी सैन्य प्रवास करत आता अशा ठिकाणी येवून पोहोचले की त्यांना मागे ही जाता येत नव्हते आणि पुढे जायचा त्राण त्यांच्यात उरले नव्हते. अशाच एका रात्री हे सर्व गाफिल सैन्य गाढ झोपेत असताना शिर्क्यांच्या आणि मोरेंच्या संयुक्त सैन्याने या सैन्यावर आकस्मिक हल्ला करून सर्व सैन्य कापुन काढले. या लढाईत मराठ्यांनी युक्तीने आक्रमकांचे पारिपत्य केले.

           सन १४६९ मलिक रेहान या बहमणी सरदाराने ७ वेळा प्रयत्न करून हा किल्ला हस्तगत केला. या मलिक रेहान च्या नावाचा दर्गा आज या गडावर आढळतो. येथे हजारो हिंदू-मुस्लिम भाविक नित्य नियमाने दर्शनासाठी येत असतात. सिद्धी जौहर जेव्हा पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता तेव्हा विशाळगडास जसवंतराव दळवी आणि सुर्यराव सुर्वे यांनी वेढा घातला होता. पन्हाळ्यावरून निसटल्या नंतर महाराजांनी हा वेढा फोडत विशाळगडाचा आश्रय घेतला होता. या किल्ल्यांच्या डागडुजी आणि बांधकामासाठी महाराजांनी ५००० होन खर्च केल्याची दफ्तरी नोंद आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील गडावर काही बांधकामे करून घेतली आहेत. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला असता महाराष्ट्राचा कारभार पाहणारे रामचंद्र पंत अमात्य यांनी विशाळगडालाच आपले मुख्य ठिकाण बनवले होते.

          सन १७०१ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिका राणीसाहेब या विशाळगडावर सती गेल्या. त्यांची समाधी गडावर आढळते. याशिवाय विशाळगडावर सहा कोरीव टाके आणि काही गुहा आढळतात. या गुहांमध्ये विशाळदेवीचे स्थान आहे. किल्ल्यावर भगवंतेश्वर मंदिर, राजवाड्याचे अवशेष, अमृतेश्वर मंदिर, मुंढा दरवाजा, रणमंडळ टेकडी, काही विहीरी आणि आठ फुटी तोफ आढळते. संकट काळात महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून लढणारे बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभु यांच्या समाधी या गडावर आहेत. सन १७०१ मध्ये औरंगजेबाने या गडावर आक्रमण केले. तब्बल ६ महिन्यांनी हा किल्ला जिंकून औरंगजेबाने त्यास सरवरलना हे नाव दिले. तद्नंतर १७०७ ला छत्रपती ताराराणी यांनी हा गड जिंकून घेतला जो १८४४ पर्यंत मराठ्यांच्या अखत्यारीत राहीला.






● गगनगड ●

          शिलाहार महाराजाधिराज भोज यांनी या गडाची निर्मिती केली आहे असे मानले जाते. दक्षिण कोंकण बंदरात उतरलेला माल  कोंकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशात येत असे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी या गडाची बांधणी झाली असावी. नागपंथीय गैबीनाथाचे हे मुळ स्थान. गडाच्या बालेकिल्ल्यावर गैबीनाथाची समाधी आढळते. सन १६५८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. एकोणिसाव्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे हा गड प्रसिद्धीस आला. येथे गगनगिरी महाराजांची समाधी आणि मठ स्थापन करण्यात आला आहे. किल्ल्यावर विठ्ठलाई देवी मंदिर, म्हसोबा मंदिर, प्राचीन विहीर, तटबंदीचे अवशेष, जुन्या घरांचे अवशेष आणि तोफा आढळतात.




● शिवगड ●

           कोल्हापूर शहरापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला दाजीपूर अभयारण्यात आहे. या गडाच्या बांधणी संबंधीचा इतिहास फारसा माहीत नसला तरी हा किल्ला शिलाहार नृपती द्वितीय भोज यांच्या काळात बांधल्याचा अंदाज आहे. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट जंगलात मधोमध एका लहानशा टेकडीवर हा किल्ला स्थित आहे. थोडाफार चढ आणि पठार वडा बालेकिल्ला असणारा हा गड आहे. शिलाहार काळात फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात या गडाचा वापर होत असे. सध्या गडावर तटबंदीचे आणि पडक्या वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडावर एक सतीशिळा आहे. या सतीशिळेला स्थानिक लोक उगवाई देवी म्हणून पुजतात. गडावरून कुरली धरण आणि दाजीपूर अभयारण्य यांचे नेत्रदीपक दृश्य दिसते. तसेच दाजीपूर अभयारण्यातील पायी सफर मन सुखावणारा आहे.




● रांगणा ●

           कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय रांगडा किल्ला म्हणजे किल्ले रांगणा. घनदाट जंगल, ओढे पार करत या किल्ल्यावर जावे लागते. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमेवर रांगणा किल्ला स्थित आहे. शिलाहार राजवंशाच्या शासन काळातच या गडाची निर्मिती झाली आहे. देश, कोंकण आणि गोवा या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा अतिशय महत्वाचा किल्ला मानला जातो. या गडाची विशेष बाब म्हणजे सह्याद्रीतील  प्रत्येक किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला  चढाई करावी लागते. मात्र रांगणा गडावर जाण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते. बाराव्या शतकात भोजनानंतर हा गड यादवांकडे आणि नंतर संगमेश्वरच्या जखुरायाकडे गेला. १४७० मध्ये बहमणी सरदारा महम्मद गावान याने हा किल्ला जिंकून घेतला. तद्नंतर या किल्ल्यांचे अधिकार आदीशहाकडे आले.  सन १६६६ ला महाराज आग्रा येथे कैदेत असताना जिजाऊंनी विशेष मोहीम काढुन किल्ले रांगणा घेण्याची जबाबदारी राहुजी सोमनाथ यांच्यावर सोपवली. १६६६ साली  हा गड स्वराज्यात सामील झाला पण लगेचच १४ एप्रिल १६६७ ला आदीलशाही सरदार बहलोलखान आणि व्यंकोजीराजे यांनी या गडाला वेढा दिला. १२ मे १६६७ रोजी शिवछत्रपतींनी जातीने येवून हा वेडा फोडला आणि यानंतर काही काळ गेल्यावर वास्तव्य केले. या गडासाठी महाराजांनी ६००० होन खर्च केल्याची दफ्तरी नोंद आहे. महाराजांनी या गडास प्रसिद्धगड असे नाव दिले.

          औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण हा गड त्याच्या हाती लागला नाही. धामधुमीच्या काळात छत्रपती ताराराणी यांनी काही काळ गडाचा आश्रय घेतला होता. 'करवीरकरांचे महास्थल' अशा प्रकारे या किल्ल्यांची नोंद करवीर दफ्तरी आढळते. याशिवाय १७८१ च्या कागदपत्रात 'एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल' असा उल्लेख आढळतो. सध्या गडावर गणेश मंदिर, रांगणाई देवी मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर, तलाव, खोदीव विहीर, निंबाळकर वाडा तसेच राजसदर यांचे अवशेष आढळतात. गडाच्या पश्चिम बाजूला कोकण दरवाजा दरवाजा, पुर्वेस नारूर दरवाजा याच्यापुढे हत्तीसोंड माची आणि केरवडे दरवाजा आढळतो. गडाजवळील पाटगाव या गावी मौनी महाराजांचा मठ आहे. या मठास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांनी सनदा दिलेल्या आहेत.





● भुदरगड ●

           पन्हाळ्या प्रमाणे हा तालुका ही येथील भूदरगड या किल्ल्यांच्या नावाने ओळखला जातो. सदर किल्ला शिलाहार राजा भोज यांनीच उभारला आहे असे मानले जाते. सन १६६७ मध्ये हा गड स्वराज्यात सामील झाला पण आदिलशहाने तो परत जिंकून घेतला. नंतर सण १६७२ हा गड पुन्हा स्वराज्यात सामील केला गेला. यानंतर मुघलांनी किल्ल्यावर ताबा मिळवला पण छत्रपती ताराराणी यांनी सन १७२१ गड जिंकून तो पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. हा गड मुख्यतः ओळखला जातो ते १८४४ च्या गडकऱ्यांच्या बंडामुळे. सन १८५७ च्या देशव्यापी उठावा पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडकर्‍यांनी इंग्रजी सत्ते विरुद्ध बंड केले. बाबाजी अहिरेकर यांच्या नेतृत्वाखाली भूदरगड इंग्रजांविरुद्ध लढला पण यात पराभुत झाला. इंग्रजांच्या ताब्यात हा गड आल्यानंतर असे बंड पुन्हा होवू नये यासाठी त्यांनी गडावरील सर्व वास्तु नेस्तनाबूत केल्या. आज गडावर भैरवनाथाचे प्राचीन मंदिर, काही वीरगळ, समाधी, दूध सागर तलाव, भवानी मंदिर, महादेव मंदिर, सैनिकांना बसण्यासाठी कातळात खोदलेली १०×१० ची खोली, गुहेत खोदलेले जाखुबाई मंदिर आढळते.




● सामानगड ●

           रांगणा, भुदरगड, गंधर्वगड, पारगड, कलानिधीगड आणि महिपालगड यांच्या मधोमध असल्यामुळे येथून सर्व गडांना रसद आणि दारूगोळा पुरवणे सोयीस्कर असल्याने या गडास सामानगड नाव पडले असावे असे मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणे हा गड देखील शिलाहार काळातच बांधला गेला आहे असे मानले जाते. या गडावरील कोरीव काम अप्रतिम आहे. संबंध कातळात कोरलेल्या विहीरी, मंदिरे, अंधार कोठडी,  कमानी हे आवर्जून पाहण्यासारखे आहे. टेहळणी करीता गडावर १० बुरुजांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय गडावर शिलाहार कालीन अनेक शिल्प, वीरगळ देखील पहायला मिळतात. सन १६६७ मध्ये हा गड स्वराज्यात आल्यानंतर याची किल्लेदारी आणि सबनीशी अण्णाजी दत्तो यांना मिळाली. त्यांनी गडावर अनेक वास्तूंची निर्मिती केली.

          मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत धाडसी घटना म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सवंगडी बहलोल खानावर चालून गेल्याची. बहलोलखानावर चालून जाण्या आधी प्रतापराव गुजरांची छावणी ही याच गडावर होती. या गडाजवळील नेसरी गावत या विरां प्रित्यर्थ स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. सन १८४४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या इंग्रजां विरुद्धच्या बंडामध्ये सामानगड अग्रणी होता. भूदरगड पडल्यानंतरही मुंजाप्पा कदम यांच्या नेतृत्वात सामानगडाने इंग्रजांविरुद्ध कडवा प्रतिकार करत दोन वेळा इंग्रजांचा हल्ला परतवून लावला. सध्या गडावर सात कमान बाव, साखर विहीर, अंधार कोठडी, भवानी मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर, झेंडा बुरुज, प्रवेश बुरुज, वेताळ बुरुज, सोंड्या चिलखती बुरुज आणि याच बुरुजा समोर मुगल टेकडी आहे. ही टेकडी मुगल सैन्याने कृत्रिम रित्या स्वयं परिश्रमाने उभारली असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. सामानगड संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.









● गंधर्वगड ●

          सभासद बखरीतील संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या 111 किल्यांचे यादीत या किल्ल्याचे नाव आहे. या गडाजवळ विशेष असे ऐतिहासिक घटना घडलेली नाही. सदर गड हा वेंगुर्ले, आंबोली घाटावर नजर ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात उभारला असावा. चंदगड तालुक्यातील गंधर्वगड हे गाव सध्या गडावर नांदते आहे. सध्या गडावर महादरवाज्याचे भग्नावशेष, काही वाड्यांचे अवशेष, प्राचीन विहीर, वीरगळ तसेच चाळकोबा मंदिर आढळते. उत्तर बाजूच्या संरक्षक तटबंदी अजून शाबूत असून यामध्ये चोर दरवाजा आणि शौचकुपाची व्यवस्था आढळते.





● पारगड ●

          गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असणारा हा किल्ला मूळ स्वराज्याच्या पार टोकास असल्याने यास पारगड नाव प्राप्त झाले असावे. गोव्याच्या पोर्तुगीजांवर आणि सावंतवाडीचे खेमसावंत यांवर वचक ठेवण्यासाठी महाराजांनी १६७६ साली या किल्ल्याची उभारणी केली. गडाच्या वास्तुशांतीसाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज येथे उपस्थित होते. यानंतर गडाची किल्लेदारी नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना देण्यात आली. या गडावर महाराजांचे काही काळ वास्तव्य राहिले होते. यावेळी गड रक्षणाचे महत्त्व सांगताना महाराजांनी 'जो पर्यंत आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा' असे उद्गार काढल्याचे सभासद बखर सांगते. रायबा मालुसरे आणि त्यांच्या वंशाजानी हे व्रत प्राणपणाने जपले आहे. मोगलांच्या दोन स्वाऱ्या या गडकर्‍यांनी परतवून लावल्या आहेत. तसेच हा गड नेहमी अजिंक्य राहीला आहे. आज गडावर हनुमान मंदिर, भवानी माता मंदिर, राजसदरेचे अवशेष, काही वीरगळ आढळतात. गडावरून कलानिधीगड, तिल्लारी जलाशयाचे आणि सांजावणाऱ्या सुर्य किरणांचे दृश्य विलोभनीय दिसते.





● कलानिधीगड ●

          छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या या किल्ल्यावरील बुरुजांची कलात्मक रचना पाहिली तर आपल्याला ह्या गडाच्या नावाचा उलगडा होतो. तसेच लांबून पाहिल्यास ह्या गडाचा आकार एखाद्या बसलेल्या नंदी प्रमाणे दिसतो म्हणून याला कलानंदीगड असे देखील नाव मिळाले आहे. पु ल देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर. त्यांचे पूर्वज या गडावर वास्तव्यास होते. गडावर भवानी मंदिर, महादेव मंदिर, भैरव मंदिर, प्रवेशद्वार, खोदीव विहीरी तसेच तटबंदी, वास्तुंचे अवशेष सापडतात. गडावरुन पारगड, तिल्लारी परिसरावर नजर ठेवता येते.




● महिपालगड ●

          शिवरायांनी वसलेला आणखी एक किल्ला म्हणजे महिपालगड. श्री गुरुचरित्रामध्ये चौदाव्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख येतो. नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या परिसरात दुर्मिळ वनौषधी आढळतात. या गडाच्या पायथ्याशी आरोग्य भवानी मंदिर आणि  वैजनाथ मंदिर आहे. ही मंदिरे हेमाडपंती बांधनीची असुन ती प्राचीन आहेत. या गडावर कार्तिक स्वामी गुहा आढळतात. गडाच्या दक्षिणेला पायरी बुरुज व महादेव बुरुज आहेत. तर ईशान्येस जळका बुरुज आहे. याशिवाय गडावर कातळात खोदलेली बारव-बाव आढळते.




● मुडागड ●

           नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी या किल्ल्याची उभारणी केली अशी दफ्तरी नोंद आढळते. या गडा मुळे तुळाजी आंग्रे यांना कोकण पट्टीवरील वसूल गोळा करणे आणि पन्हाळा प्रांतावर हल्ले करणे सोयीस्कर झाले होते. तसेच यामुळे घाटावर तसेच सध्या असणाऱ्या पडसाळी धरणाच्या परिसरावर नजर ठेवता येत होते. नाना पेशव्यांचे सहकारी येसाजी आंग्रे आणि सावंतवाडीकर यांनी हा किल्ला जिंकून घेतला. आज गडाचा ताबा अस्ताव्यस्त वाढलेल्या वेली आणि गगनचुंबी झाडांनी घेतल्यामुळे गडाचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. सध्या गडावर बुरुजाचे अवशेष, वाड्याचे जोते, पाण्याचे टाके दिसून येते.

          शिवारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुडागडच्या परिसरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी तटबंदी करुन खास विदेशातुन आणलेले काही हत्ती येथे ठेवले होते. या हत्तींसाठी उभारण्यात आलेले तलाव, टाके आज देखील येथे आढळतात.




● दुशाळगड ●

         मुडागड पडल्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी साखरपा तर्फे देवळे येथे १७५२-५३ दरम्यान दुशाळगड बांधला असे दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. या गडावर जमाव करून कोंकणपट्टी वरील महसूल गोळा करण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे साखरपा तर्फे देवळे येथील एका छोट्या टेकडीवर असणारा हा किल्ला गर्द झाडींनी पूर्ण झाकोळला गेला आहे. सध्या इथे तटबंदी आणि बुरुज यांचे काही अवशेष आढळतात. सदर किल्ला शिवप्रसाद पाटील आणि प्रणालक इतिहास संशोधन मंडळाने शोधला आहे.




संदर्भ -

1) दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे

                - भगवान चिले

2) कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले

               - प्रवास : Prathmesh Harale YouTube Channel

3) दुर्गवारी

               - D Subhash Production YouTube Channel


               🙏 धन्यवाद 🙏



सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. 9503973234

ई मेल : tibilesuraj7@gmail.com